मुंबई : विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील तीन पक्षात अजिबात समन्वय राहिलेला नाही, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होणार का? या चर्चांना उधाण आले आहे.
संजय राऊत म्हणाले की, "ज्याप्रमाणे लोकसभा निवडणूकीनंतर इंडीया आघाडीत बैठकच झाली नाही. तसेच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील तीन पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही, हे सत्य आहे. तो जर राहिला नाही तर भविष्यात सगळ्यांना त्याची किंमत मोजावी लागेल."
"लोकसभा निवडणूकीसाठीच इंडीया आघाडीची स्थापना झाली, हे सत्य आहे. त्यामुळे इंडिया आघाडी, महाविकास आघाडी किंवा इतर राज्यांतील आघाड्यांसंदर्भात लोकांनी वेगळ्या भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. याला जबाबदार कोण? काँग्रेस पक्ष हा देशातील मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे," असे ते म्हणाले.
आम्ही जमिनीवरच आहोत!
खासदार अमोल कोल्हेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात बचेंगे तो और भी लडेंगे ही भूमिका कायम शिवसेनेने घेतली. याचा अर्थ आम्ही राहिलेलो नाही असा होत नाही. आम्ही जमिनीवरच आहोत. लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे. आम्ही कधीही झुकलो नाही, तुटलो नाही आणि विकलो गेलो नाही. समोरच्या गटात सामील होऊन सत्तेची ऊब घ्यावी, असे आमच्या एकाही आमदाराचे म्हणणे नाही. त्यामुळे आम्ही लढत राहू," असेही ते म्हणाले.