मुंबई : ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही अन् काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, अशी टीका शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मित्रपक्षांवर केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेले दोन दिवस यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटनात्मक बैठक पार पडली. शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली असून या बैठकीत अमोल कोल्हेंनी मित्रपक्षांना घरचा आहेर दिल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यातील परिस्थिती पाहता ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही आणि काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, असे वक्तव्य अमोल कोल्हेंनी केल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणूकीतील पराभवाने महाविकास आघाडी पुरती खचली असून कार्यकर्ते निराशेच्या भावनेत आहेत. दरम्यान, अशा परिस्थितीत अमोल कोल्हेंच्या या वक्तव्याने आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.