मुंबई : (Dharavi Land Jihad) धारावीतील ९० फूट रस्त्यावरील सुभानिया मशिदीचे अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी पालिकेचे पथक त्याठिकाणी पोहोचले होते. २५ वर्ष जुन्या या सुभानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम पाडू नये यासाठी संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या पथकाला रोखले. पालिकेच्या वाहनाच्या काचांची तोडफोड केली. पालिकेच्या पथकाचा रस्ता अडवण्यात आला. इतक्या मोठ्या संख्येने जमाव अचानक जमा झाल्याने आधीच मशिदीच्या नावे फतवे काढण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. ज्यामुळे धारावीतील लँड जिहादचे मोठे प्रकरण उघडकीस आल्याची चर्चा आहे.
दरम्यान धारावीतील तणावपूर्ण वातावरणाचा आढावा घेण्यासाठी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त घटनास्थळी पोहोचले. तसेच ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि उत्तर - मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार वर्षा गायकवाड या देखील घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी भेट देण्याआधी गायकवाड यांनी याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत, ठिय्या मांडणाऱ्या नागरिकांना शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहन केले.
दुसरीकडे मशिदीच्या ठिकाणाचे अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने चार ते पाच दिवसांची मुदत द्यावी. या मुदतीच्या कालावधीत स्वतःहून बांधकाम हटवण्यात येईल, अशी लेखी विनंती मशिदीच्या विश्वस्तांनी महानगरपालिकेचे परिमंडळ २ चे उपआयुक्त आणि जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्तांकडे केली आहे. ज्यानंतर संबंधितांनी स्वतःहून बांधकाम हटवण्याची लेखी विनंती केल्याने महानगरपालिका प्रशासनाने ही विनंती मान्य केली. तसेच ठरल्या मुदतीत हे अतिक्रमित बांधकाम काढून टाकावे, असे निर्देशही विश्वस्तांना दिले.
अतिक्रमित भागावरील कारवाई रोखण्यासाठी फतवे
धारावी येथील सुभानिया मशीद पाडण्यासाठी महापालिका व पोलिसांची माणसे येणार आहेत म्हणून दि. २१ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता सर्वांनी जमावे, अशा आशयाचे एक पत्र सुभानिया मशिदीच्या लेटरहेडवर व्हायरल करण्यात आले होते. त्यामुळे या पत्राची वास्तविकता काय आहे, हे पत्र कोणी व्हायरल केले, कोणी समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला? याची चौकशी मुंबई पोलीस आयुक्तांनी करावी, अशी विनंती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे. तसेच महायुतीत मुस्लीम लांगूनचालन खपवून घेणार नाही. अनधिकृत मशीद तोडताना अधिकार्यांना मारहाण करणे महाराष्ट्रात चालणार नाही. मुस्लिमांचे लांगुलचालन करणे आणि दंगली घडण्याचे काम ठाकरे गटाकडून आणि काँग्रेसकडून महाराष्ट्रात सुरु आहे.