राज्यभरात ‘स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता’ संकल्पना राबवणार

19 Sep 2024 17:37:27

swachhata
 
मुंबई : (Swachhata) 'स्वच्छता ही सेवा - २०२४' या राज्यस्तरीय अभियानाचा गुरुवार, दि. १९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. हे अभियान येत्या २ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागांत ‘स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता’ ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
 
'स्वच्छता ही सेवा - २०२४' अभियानाचा गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्‍त अश्विनी भिडे, सेना दलाचे अधिकारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सफाई कर्मचारी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. यामुळे मुंबईचे प्रदुषण कमी झाले असून सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. स्वच्छता ही सेवा अभियानाच्या उपक्रमाद्वारे आर.आर.आर. (रिड्युस, रियुज, रिसायकल) केंद्र उभारून पर्यटन स्थळावर शुन्य कचरा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांअंतर्गत वृक्षारोपण आणि सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू आहे. नियमित स्वच्छ न होणारी ठिकाणे शोधण्यात आली असून अशी ठिकाणे कायमस्वरूपी स्वच्छ राहील, याकरिता त्रिसुत्री नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र पहिला
 
मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. या स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबई महानगरपालिकेने दीड लाख झाडे पावसाळ्यात लावली आहे. या अभियानामध्ये ९ हजार ३५९ कार्यक्रमाची नोंदणी झाली असून सीटीयू (क्लिनलीनेस टार्गेट युनिट) अंतर्गत ४ हजार ५२० ठिकाणे शोधली असून या ठिकाणचा कचरा उचलला जाणार आहे. याकरिता जनसहभागाचे ४ हजार १११ कार्यक्रम राबविले जाणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0