कांदा व बासमतीचे किमान निर्यात मूल्य काढल्याने शेतकऱ्यांना दिलासा

14 Sep 2024 12:35:56

MEP
 
मुंबई : देशासह महाराष्ट्रातील लाखो कांदा व बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्यावर (एमईपी) असलेल्या अटी रद्द केल्या आहेत. यामुळे शेतकरी कोणत्याही प्रकारचे शुल्क न देता कांदा व बासमती तांदूळ निर्यात करू शकतील. शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांचे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले आहेत.
 
महाराष्ट्रात मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे तर कोकण व पूर्व विदर्भात बासमती व इतर तांदळाच्या वाणाचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हित साधले जाणार आहे.
 
कांदा उत्पादकांचे उत्पन्न वाढणार
 
केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अधिनस्त विदेशी व्यापार महासंचालक संतोष कुमार यांनी अधिसूचना जारी करून कांद्याच्या निर्यातीवर लावण्यात आलेले किमान निर्यात मूल्य तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत रद्द केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा चांगला भाव मिळेल, असा विश्वास आ. बावनकुळे यांनी व्यक्त केला. यापूर्वी कांद्यावर ५५० डॉलर प्रति टन एमईपी आकरली जात होती.
 
बासमती तांदळाची निर्यात वाढेल
 
सोबतच केंद्र सरकारने बासमती तांदळावर लावलेला ९५० डॉलर प्रति टन निर्यात मूल्य देखील रद्द केला आहे. यामुळे विदर्भातील बासमती तांदूळ उत्पादकांना त्यांचा तांदूळ थेट विदेशी बाजारात विक्रीसाठी पाठवता येणार आहे. शेतकऱ्यांकडून बासमती तांदळाची निर्यात वाढणार असून धान उत्पादकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0