नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने नेहमीच देशाच्या सुरक्षेस लक्ष्य केले आहे. देशविरोधी शक्तींशी संधान साधणे आणि त्यांची साथ देणे ही तर राहुल गांधी यांची सवयच आहे, असा घणाघात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केला आहे. अमेरिका दौऱ्यावर असलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे त्यांच्या भारतविरोधी वक्तव्यावरून अडचणीत आले आहेत. सत्ताधारी भाजपने त्यांच्यावर टिकेची झोड उठविली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर देशविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवला आहे.
ते म्हणाले, देशविरोधी बोलणे आणि देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभे राहणे ही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची सवय झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील जेकेएनसीच्या देशविरोधी आणि आरक्षणविरोधी अजेंड्याला पाठिंबा देणं असो किंवा परदेशी मंचांवर भारतविरोधी बोलणं असो, राहुल गांधींनी नेहमीच देशाची सुरक्षा आणि भावना दुखावल्या आहेत. भाषा ते भाषा, प्रदेश ते प्रदेश आणि धर्म ते धर्म असा भेदभाव करणे हे राहुल गांधी यांची फुटीरतावादी विचारसरणी दर्शवते.
देशातून आरक्षण संपुष्टात आणण्याची भाषा करून राहुल गांधी यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणला आहे. मनातील विचार आणि कल्पना नेहमी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर पडतात. आपण राहुल गांधींना सांगू इच्छितो की, जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही आणि देशाच्या एकात्मतेशी कोणी खेळू शकत नाही, असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नमूद केले आहे.
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील राहुल गांधींवर टिका केली आहे. ते म्हणाले, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आपल्या परदेश दौऱ्यात ज्या प्रकारची दिशाभूल करणारी, निराधार आणि तथ्यहीन गोष्टी बोलत आहेत ते अत्यंत लज्जास्पद आणि भारताच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे. भारत-चीन सीमावादाच्या संदर्भात त्यांनी अमेरिकेच्या भूमीवर ज्या प्रकारचे दावे केले आहेत तेही दिशाभूल करणारे आणि वस्तुस्थितीच्या पलीकडे आहेत. राहुल गांधी यांनी प्रेमाचे दुकान चालवण्याऐवजी खोट्याचे दुकान उघडल्याचे दिसते, असा टोला संरक्षण मंत्र्यांनी लगावला आहे.