मुंबई : काँग्रेसचा बुरखा रोज फाटतोय आणि ते काम राहुल गांधी स्वतःच करत आहेत, अशी खोचक टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून तिथे त्यांनी आरक्षण संपवण्याबाबत भाष्य केलं होतं. यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात येत.
केशव उपाध्ये म्हणाले की, "इलेक्शन आलं की, खोटं बोलून फसवा आणि लोकांना येड्यात काढा हा गांधी-नेहरू परिवाराचा पिढ्यान्पिढ्या चालत आलेला खेळ आहे. १९६१ मध्ये जातीवर आधारित आरक्षण विकासात अडथळा ठरते, असे पंडीत नेहरू म्हणाले होते. १९८५ मध्ये आरक्षणाच्या नावावर बुद्धिहीन लोकांना प्रोत्साहन नाही, असे राजीव गांधी म्हणाले होते. आणि आता २०२४ मध्ये समानता आणण्यासाठी आरक्षण रद्द करण्याचा विचार करू, असे राहूल गांधी म्हणाले आहेत."
हे वाचलंत का? - वसई-विरार महानगरपालिकेला एका महिन्यात मिळाल्या ४० इलेक्ट्रिक बस!
"त्यामुळे आरक्षणविरोधी कोण आहे, हे सगळ्यांना लक्षात येतंय. केवळ निवडणुकांमध्ये मुद्दा म्हणून आरक्षण आणि संविधान बचावचे नारे लावल्याने सत्य लपत नाही. काँग्रेसचा बुरखा रोज फाटतोय आणि ते काम राहुल गांधी स्वतःच करत आहेत," अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी केली आहे.