मुंबई : राज्यभरात गणेशोत्सवानिमित्त महापालिकांकडून विसर्जनाची तयारी करण्यात येत आहे. महापालिकांकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि विसर्जन यांना पाठबळ दिले जात असून नवनवे उपक्रम हाती घेण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण जागरूकतेसाठी "पर्यावरणपूरक गणेशोत्सव/विसर्जन आपल्या दारी" उपक्रम सुरू केला आहे.
दरम्यान, महापालिकेने हाती घेतलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून घराजवळील कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनास प्रोत्साहन देऊन भक्तांचा सन्मान केला जात आहे. पर्यावरण जागरूकतेसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे. श्री गणेशमुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करणा-या गणेश मंडळ/व्यक्तींना महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र प्रदान येत आहे.
गणपती विसर्जन आपल्या दारी यामाध्यमातून कृत्रिम तलावांमध्ये एक निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहे. येथे भाविकांना निर्माल्य टाकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून निर्माल्यापासून खत तयार करून पालिकेच्या उद्यानांमधील झाडांसाठी वापरण्यात येते. गेल्या काही वर्षापासून गणेशभक्त नजीकच्या कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जनाला प्राधान्य देत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी अधिकाधिक पुढाकार घ्यावा, हाच उपक्रमामागील उद्देश आहे, असे आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले.