केजरीवाल सरकार बरखास्त करा - भाजप आमदारांची राष्ट्रपतींना विनंती

10 Sep 2024 17:47:58

bjp delhi
 
नवी दिल्ली, दि. १० : विशेष प्रतिनिधी : दिल्ली सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी विनंती दिल्लीतील भाजप आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली आहे. राष्ट्रपती भवनाने संबंधित पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवले आहे.
 
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल सध्या मद्य घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. परिणामी केजरीवाल हे तुरंगातूनच दिल्ली सरकारचा कारभार पाहत आहेत. मात्र, भाजपने आता त्याविरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे.
 
गेल्या महिन्यात ३० ऑगस्ट रोजी दिल्लीच्या भाजप आमदारांनी विजेंदर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींची भेट घेतली होती. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे तुरुंगात असून त्यामुळे राज्यात घटनात्मक संकट उभे राहिले आहे. परिणामी दिल्ली सरकार तातडीने बरखास्त करण्याच यावे, असे पत्र भाजपच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना दिले होते. त्यानंतर आता राष्ट्रपती भवनाने ते पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवले आहे, अशी माहिती भाजप आमदार विजेंदर गुप्ता यांनी दिली आहे.
 
दिल्लीचा कारभार ठप्प – भाजपचा आरोप
 
राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात भाजप नेत्यांनी आम आदमी पक्षाच्या सरकारमुळे दिल्लीतील घटनात्मक संकट अधिक गडद झाल्याचे म्हटले होते. प्रदेशाची प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. दिल्ली सरकारने एकापाठोपाठ एक अनेक गैरप्रकार केले आहेत. दारू धोरण, पाणी मंडळातील आर्थिक अनियमितता यासह अनेक प्रकरणे आहेत. तक्रारींवर राष्ट्रपतींनी गृह मंत्रालयाला या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0