हिंदूंची एकजूट हेच धर्मावरील आक्रमणाचे उत्तर – योगी आदित्यनाथ

07 Aug 2024 17:40:40

Yogi Adityath
 
नवी दिल्ली : भारताचे सर्वच शेजारी धगधगत असून तेथे हिंदूंनाही लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे हिंदूंची एकजूट हेच धर्मावरील आक्रमणाचे उत्तर आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केले आहे. अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत रामचंद्र दास यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. यावेळी त्यांनी बांगलादेशातील राजकीय अस्थिरता आणि हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य केले. ते म्हणाले, सध्याच्या जागतिक परिस्थितीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
 
भारताचे सर्व शेजारी आज धगधगत आहेत, तेथे मंदिरे पाडली जात आहेत आणि हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. या घटनांकडे पाहताना इतिहासाला विसरून चालणार नाही. कारण जो समाज चुकांमधून धडे घेत नाही, त्याचे भवितव्य नेहमीच धोक्यात असते. सनातन धर्मावर येणाऱ्या संकटासाठी पुन्हा एकदा एकजुटीने काम करण्याची गरज आहे. सनातन धर्माच्या बळामुळे या सर्व मोहिमांना नवी गती मिळते.
 
एकजूट समाजाची स्थापना करण्यासाठीच अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराची उभारणी नवे बळ देते, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनीदेखील बांगलादेशातील स्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशात घडलेली घटना चिंताजनक आहे, त्याला दोन पैलू आहेत. एक म्हणजे बांगलादेशात अशीच अशांतता सुरू राहिल्यास काही लोकांना भारतात येण्यास भाग पाडले जाईल.
 
त्यामुळे भारतास सीमा सुरक्षित कराव्या लागतील. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शेख हसीना यांच्या काळात ईशान्येकडील सर्व दहशतवादी गटांना बांगलादेशातून हटवण्यात आले होते. बांगलादेश पुन्हा एकदा अशा दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनू नये, ही आपल्यासाठी चिंतेची बाब असेल. केंद्र सरकार याविषयी नक्कीच योग्य ते निर्णय घेईल, असाही विश्वास सर्मा यांनी व्यक्त केला आहे.
दुतावासातील कर्मचारी मायदेशी
बांगलादेशात अडकलेल्या भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतात आणण्यात आले आहे. भारतीय उच्चायुक्तालयातील १९० कर्मचारी बांगलादेशातून भारतात परतले आहेत. सुमारे ३० कर्मचारी अजूनही ढाका येथे आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0