उध्वस्त शेजारी आणि भारतापुढील आव्हाने

06 Aug 2024 18:41:46

Bangladesh
 
नवी दिल्ली : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे देश पुन्हा एकदा कट्टरतावाद्यांच्या हाती जाण्याची चिन्हे आहे. या पार्श्वभूमीवर भारतासही नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सावध राहणे आवश्यक बनले आहे. बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात पेटलेल्या आंदोलनाची परिणती शेख हसीना यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा आणि देश सोडण्यात झाली आहे.
 
त्यामुळे त्या आंदोलनाच्या नेमक्या मनसुब्याविषयीही आता शंका निर्माण झाली आहे. बांगलादेशचे भुराजकीय स्थान पाहता हा देश अस्थिर राहण्यात जगातील अनेकांचा स्वार्थही आहेच. सध्या भारतात असलेल्या शेख हसीनादेखील लवकरच अन्यत्र राजकीय आश्रय घेतील. मात्र, त्यानंतर बांगलादेशमध्ये स्थापन होणाऱ्या सरकारकडे भारतास बारकाईन लक्ष ठेवावे लागणार आहे.
 
बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भारताचा सिंहाचा वाटा होता. भारताने १९७१ साली वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्यासोबत भारताचे सलोख्याचे संबंध होते. त्यानंतरही अपवाद वगळता दोन्ही देशांची मैत्री जवळपास ५० वर्षे जुनी आहे. मात्र, आता शेख हसीना यांनी सत्ता सोडताच बांगलादेश उध्वस्ततेच्या वाटेवर जात आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आगामी काळात कसे असतील, बांगलादेशच्या नव्या सरकारचा कल नेमका कोठे असेल ही आणि अशी काही आव्हाने भारतासमोर निर्माण होऊ शकतात.
 
अशी असतील आव्हाने
1. घुसखोरी – भारत आणि बांगलादेशदरम्यान जवळपास ५ हजार किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. भारतातील पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांशी ही सीमा जोडलेली आहे. हा सीमेवर घुसखोरी, अंमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी, गुरांची तस्करी आणि दहशतवाद अशा अनेक समस्या आहेत. बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीएसएफचे सीमेवर बारकाईने लक्ष आहे.
 
2. हिंदूंसह अल्पसंख्यांकांवरील हल्ले – बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवर, प्रामुख्याने हिंदूंवर तेथे मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. गेल्या काही दिवसात तेथील हिंदू समाज, मंदिरे, घरे आणि व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण, व्यवसायासह अन्य कारणांसाठी तेथे गेलेल्या भारतीयांचीही काळजी केंद्र सरकारला घ्यावी लागणार आहे.
 
3. चीन आणि पाकिस्तान – चीन आणि पाकिस्तान या भारताच्या दोन त्रासदायक शेजाऱ्यांचाही हुरूप वाढण्याची शक्यता आहे. बांगलादेशात आता लष्कर, जमात ए इस्लामी हा राजकीय पक्ष आणि चीन- पाकधार्जिण्या खालिदा झिया हे घटक पुन्हा केंद्रस्थानी आले आहेत. त्यामुळे बांगलादेशातील नव्या सरकारचा कल नेमका कसा असेल, हे भारतासाठी महत्त्वाचे असेल.
 
4. व्यापार - भारत बांगलादेशला कांदा तसेच वीज, कृषी आणि औद्योगिक उपकरणे आणि पेट्रोलियम उत्पादनांसह आवश्यक अन्नपदार्थांची निर्यात करतो. शेख हसीना यांचे सरकार गेल्यानंतर या निर्यात बाजाराला आता अनिश्चिततेने घेरले जाऊ शकते. दोन्ही देशांमध्ये सुमारे १२.९ अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात ११ अब्ज डॉलर्ससह बांगलादेश भारताचा आठवा सर्वात मोठा निर्यातदार भागीदार आहे.
 
5. भारताची गुंतवणूक - भारताने बांगलादेशमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. देशातील सध्याच्या परिस्थितीचा परिणाम तेथे सुरू असलेल्या प्रकल्पांवरही होण्याची भीती आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसमोर मोठा धोका निर्माण झाला आहे. दोन्ही देशांच्या चांगल्या संबंधांमुळे गेल्या काही वर्षांत अनेक बड्या भारतीय कंपन्यांनी बांगलादेशमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. भारतीय कंपन्यांनी तेथे ऊर्जा, वस्त्रोद्योग, औषधनिर्माण यांसारख्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0