जागतिक खाद्यान्न सुरक्षेसाठी भारत कटिबद्ध – पंतप्रधान नरेंद्र मोदी

03 Aug 2024 17:57:47

Narendra Modi  
 
नवी दिल्ली:कधीकाळी भारताची अन्न सुरक्षा हा जागतिक चिंतेचा विषय होता, मात्र आज भारत जागतिक अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी उपाय मांडणारा देश झाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी अर्थतज्ज्ञांच्या ३२ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेस संबोधित करताना शनिवारी केले. देशात याआधी ६५ वर्षांपूर्वी झालेल्या कृषी अर्थतज्ज्ञांच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेची आठवणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिली.
 
त्यावेळी भारत हा नव्याने स्वतंत्र झालेला देश होता आणि देशाची अन्न सुरक्षा आणि शेतीसाठी तो भारताकरता मोठा आव्हानात्मक काळ होता असे ते म्हणाले. मात्र आजच्या घडीला भारत हा खाद्यान्नाचा अधिशेष असलेला देश झाला असून, आता भारत दूध, कडधान्ये आणि मसाल्यांचा सर्वात मोठा उत्पादक देश ठरला आहे, त्याचवेळी अन्नधान्य, फळे, भाजीपाला, कापूस, साखर, चहा आणि मत्स्यशेतीद्वारे उत्पादित माशांचा जगभरातला दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश बनला असल्याची बाब त्यांनी उपस्थितांसमोर मांडली.
 
कधीकाळी भारताची अन्नसुरक्षा ही जगासाठी चिंतेची बाब ठरली होती, पण आजच्या स्थितीला भारत हा जागतिक अन्न आणि पोषण सुरक्षेवरच्या उपाययोजना आखू लागला असल्याची जाणिव त्यांनी उपस्थितांना आपल्या संबोधनातून करून दिली. भारताचे हे परिवर्तन लक्षात घेऊनच खाद्यान्न व्यवस्थेमधील परिवर्तनावरच्या चर्चांमध्ये भारताचा अनुभव मोलाचा ठरणारा आहे, आणि त्याचा लाभ ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांना होणार आहे असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
 
पंतप्रधानांनी पाणीटंचाई आणि हवामान बदलासह पोषणाशी संबंधित आव्हानांचे गांभीर्यही उपस्थितांसमोर मांडले. अशा परिस्थितीत सुपरफूडचा दर्जा असलेली श्रीअन्न अर्थात भरडधान्ये सर्वात महत्वाचे उपाय आहेत, कारण ती कमीत कमी पाणी आणि जास्तीत जास्त उत्पादन या संकल्पनेला धरून आहेत असे त्यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातली भरडधान्यांची संपदा जगासोबत सामायिक करण्याची इच्छाही व्यक्त केली आणि त्याअनुषंगानेच मागचे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले गेल्याचेही नमूद केले.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0