इस्लामपूर नव्हे ईश्वरपूर म्हणा! नितेश राणेंचं जनतेला आवाहन

29 Aug 2024 16:13:14
 
Nitesh Rane
 
सांगली : इस्लामपूर नव्हे ईश्वरपूर म्हणा, असे आवाहन भाजप नेते नितेश राणेंनी केले आहे. इस्लामपूरचे ईश्वरपूर झालेच पाहिजे या मागणीसाठी आणि बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधात गुरुवारी उरण ईश्वरपूर येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
 
नितेश राणे म्हणाले की, "पाकिस्तानमध्ये किंवा कुठल्याही इस्लाम राष्ट्रामध्ये एकही असं गाव, तालुका आणि शहर नाही ज्याचं नाव श्रीरामनगर किंवा भगवतीनगर आहे. चुकून जर त्या गावाचं किंवा तालुक्याचं नाव कुठल्याही हिंदू देवी देवतांच्या नावावर असेल तर तिथल्या हिंदूंना पाकिस्तानचे जिहादी जिवंत ठेवतील का? मग आपण हे इस्लामपूर नाव का उच्चारतो? आपण या जिहाद्यांचे लाड का सहन करतोय? हे लोकं कधी आपल्याला असे डोक्यावर उचलून धरतात. मग सगळी नाटकं आपणच सहन करायची का?" असा सवाल त्यांनी केला.
 
हे वाचलंत का? -  राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर ४२ जणांवर गुन्हा दाखल!
 
"यांच्या सणांच्या दिवसांत रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणूका चालतात आणि आमच्या नवरात्र आणि गणेश चतुर्थीच्या मिरवणूका १० वाजून १ मिनिटांपर्यंत चालल्या की, लगेच नोटीस घेऊन येतात. आपल्याला हायकोर्टाचा नियम दाखवतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात सर्वधर्म दिला आहे. हे सर्वधर्म समभावाचं चुर्ण फक्त आपल्या हिंदूंनाच दिलं जातं. त्यांना कधीच दिलं जात नाही. सगळे नियम आणि कायदे आम्हीच पाळायचे."
 
ते पुढे म्हणाले की, "यापुढे इस्लामपूरचं नाव ईश्वरपूरच ठेवायचं आहे हे ठासून सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. ही माझी मागणी नाही तर ही आमच्या डॉ. हेडगेवार यांची आहे. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचीही ही मागणी आहे. जसं औरंगाबादचं नाव बदलून आम्ही छत्रपती संभाजीनगर करून दाखवलं तसं काही महिन्यात इथल्या दुकानाच्या पाट्यांवर लिहिलेल्या इस्लापूरवर पट्या लावून तिथे ईश्वरपूर लिहावं लागेल," असेही ते म्हणाले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0