बदलापूर अत्याचार प्रकरण : सीसीटीव्ही बंद असल्याचे उघड

    20-Aug-2024
Total Views |

Badlapur
 
(बदलापूर - शाळेबाहेर ठिय्या Image Credit - PTI )

ठाणे : बदलापूर लहान मुलींवर अत्याचार प्रकरणात आता नवा खुलासा करण्यात आला आहे. घटनास्थळाचा सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे केसरकर यांचे सांगितले. मंगळवारी केसरकर यांनी या प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. असे प्रकरण पुन्हा घडू नये यासाठी सखी सावित्री समिती स्थापन करण्यात यावी. पॉस्को अॅटनुसार, तक्रारपेटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
 
ही तक्रार पेटी शाळा व्यवस्थापन व पोलीसांच्या समक्ष उघडली जाईल. शाळा स्तरावर सुद्धा विशाखा समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. या संदर्भात संबंधित खात्याच्या पीआय यांची बदली करण्यात आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले, वर्गशिक्षिका दीपाली देशपांडे, सहाय्यक कामिनी गायकर आणि निर्मला भोरे यांनाही निलंबित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. इतके झाल्यानंतरही शाळेची जबाबदारी कमी होत नाही, त्यामुळे खासगी शाळांमध्येही सीसीटीव्ही सुद्धा सुरू असले पाहिजेत, असा इशारा मंत्री केसरकर यांनी दिला आहे. शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा सुरू आहेत ना त्यांची देखभाल दुरूस्ती वेळेत केली गेली आहे का? या संदर्भातील परिपत्रक शासनाद्वारे करण्यात येणार आहे.
 
आरोपी अक्षय रामा शिंदे, असे आरोपीचे नाव असून आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा यासाठी गृहमंत्र्यांशी बोलून घेणार असल्याचेही केसरकर म्हणाले. जितक्या जलद शक्य होणार तितक्या जलद ही कारवाई केली जाईल, गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आरोपीला शिक्षा होईल. स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या घटनेवर लक्ष ठेवून आहेत, असेही केसरकर म्हणाले. जिल्हा परिषदेच्या शाळेत सीसीटीव्ही नसतील तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या संदर्भात लक्ष घालावे, मुख्य अधिकाऱ्यांनाही याबद्दल उत्तर देणं बंधनकारक आहे, या संदर्भातील जीआर लवकरच निघेल, अशी माहिती त्यांनी दिली.

बदलापूरात आंदोलन सुरूच!
 
दरम्यान या सर्व आश्वासनानंतरही बदलापूरात रेल रोको सुरूच होता. प्रवाशांनी रेल रोको आंदोलन थांबविण्यास नकार दिला आहे. पोलीसांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हजारो नागरिक रेल्वे रुळावर ठिय्या धरून आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चेंगराचेंगरीत अन्य कुठल्याही महिला आंदोलकांना त्रास होईल, त्यामुळे रेल्वे रुळांवरुन बाजूला व्हा, असे आवाहन त्यांनी केले.