औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
02-Aug-2024
Total Views |
नवी दिल्ली :औरंगाबाद आणि उस्मानाबाद या महसुली विभागांचे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळले. न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्या. एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आणि उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले.
खंडपीठाने पुढे म्हटले आहे की अशा प्रकरणांवर वेगवेगळ्या व्यक्तींचा दृष्टिकोन वेगवेगळा असेल. न्यायालय न्यायिक पुनरावलोकनाच्या अधिकारांचा वापर करताना त्याचे परीक्षण करू शकत नाही. न्यायालयाने असेही म्हटले आहे की राज्याने दोन शहरांची नावे बदलण्यापूर्वी कायद्यानुसार घालून दिलेल्या प्रक्रियेचे व्यापकपणे पालन केले आहे.
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, एखाद्या भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी एखाद्या स्थानाच्या नावाविषयी नेहमीच सहमती आणि असहमती असते. त्यामुळे असे वाद न्यायालयांनी न्यायिक समीक्षेद्वारे सोडवावे का, हा प्रश्न आहे. जर त्यांच्याकडे (राज्य सरकार) नाव ठेवण्याचा अधिकार आहे तर ते नाव बदलूही शकतात. मुंबई उच्च न्यायालयाचा हा अतिशय तर्कसंकत निर्णय असून त्यात कोणतीही चूक नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.