मुंबई : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पालिकेच्या प्रभाग कार्यालयात ईडी आणि लाचलूचपत प्रतिबंधक कार्यालये सुरु करावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा विशेष कार्यकारी अधिकारी सदानंद साटम यांनी केली आहे. के\ पूर्व प्रभागात झालेल्या लाचप्रकरणानंतर त्यांनी ही मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, के\ पूर्व प्रभागात गेल्या ५ वर्षात एकूण ३ लाचखोरीच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान दि. ८ ऑगस्ट रोजी के\ पूर्व प्रभागातील इमारत खात्यातील सहाय्यक अभियंते मंदार तारी यांनी त्यांच्या वतीने मोहम्मद शहेजादा शहा आणि प्रतीक पिसे या दोघांनी ७५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ज्यानंतर पदनिर्देशित अधिकारी मंदार तारी यांच्यासह पिसे आणि शहा यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला. दोन खासगी एजंटना एसीबीने अटक केली असून तारी मात्र गुंगारा देत आहे.
त्यातच तारी याच्या मुंबई येथील निवासस्थानी छापा घालून शोधाशोध सुरु आहे. त्यात त्याच्या दोन साथीदारांच्या कारमधून आणखी नऊ लाखांची रोकड सापडली आहे. हे नऊ लाख कुणी दिले, याबाबत एसीबीकडून तपास सुरु आहे. यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याचे मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच लाचेच्या रक्कमेत अहवालात नमुद केलेल्या गुन्हेगारांव्यतिरिक्त आणखी किती वरिष्ठ या प्रकरणात सहभागी आहेत? यांची चौकशी व्हायला हवी. त्याचबरोबर लाचखोरीचे हे प्रकरण पालिका आयुक्तांनी गंभीरतेने हाताळणे गरेजेचे असून लवकरात लवकर प्रभाग कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय सुरु करावे, अशी मागणी साटम यांनी केली आहे.