मुंबई : संजय राऊतांनी परत एकदा काँग्रेस आणि शरद पवार गटाचा अपमान केला आहे, अशी टीका भाजप नेते नितेश राणेंनी केली. महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे २ सरकार येणार, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. यावर आता राणेंनी प्रतिक्रिया दिली.
नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊतांनी परत एकदा अप्रत्यक्षपणे काँग्रेस आणि शरद पवार गटाला फाट्यावर मारलं आहे. राज्यात परत ठाकरे २ सरकार येणार, असं बोलून त्यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटाचा अपमान केला आहे. एकीकडे दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना मुजरे करायचे आणि महाराष्ट्रात आल्यावर ठाकरे २ सरकार येणार असं छातीठोकपणे सांगायचं," असा टोला त्यांनी लगावला.
हे वाचलंत का? - महापालिकांच्या निवडणूकांना उशीर होण्याचं एकमेव कारण म्हणजे उबाठा गट!
ते पुढे म्हणाले की, "मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते पवार साहेबांना भेटले त्यांनी घेतलेली भूमिका फार महत्वाची आहे. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याला माझा पाठींबा आहे, असं पवार साहेबांनी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं आहे. म्हणजेच आमच्या महायुती सरकारने दिलेल्या आरक्षणाला पवार साहेबांचा पाठिंबा आहे. पण जर सर्वच नेत्यांची हीच भूमिका असेल तर हिंदुमध्ये फूट पाडण्याचे काम कोण करतंय?" असा सवाल त्यांनी केला. तसेच हिंदू म्हंणून आपण जे आपसात भांडत आहोत ते कृपया बंद करावे, असे आवाहनही त्यांनी केले.