संत रामदास स्वामींचा ‘रघुवीर समर्थ’ (भाग तिसरा)

10 Aug 2024 21:28:39
Raghuveer Samarth

प्रभू रामचंद्रांचे सद्गुरु म्हणून नाम, वर्णन, भक्ती, उपासना आणि चरित्र या गोष्टींचे समर्थ रामदास स्वामी अनेक प्रकारे, अनेक ठिकाणी स्तवन करतात. त्यांनी अनेक नाममुद्रा घेऊन भक्तिरचना केलेल्या आहेत. त्यांच्या साहित्यामध्ये रामदर्शनाचे विलोभनीय इंद्रधनुष्य आहे. त्यांनी वाल्मिकी रामायणातील रामापेक्षा वेगळा, ‘देवबंधमुक्ती’ करणार्‍या योद्ध्या रामाचा, संत एकनाथांच्या भावार्थ रामायणातून स्वीकार केला. ‘धर्म जागो राघवाचा।’ म्हणत समर्थांनी समाजात स्वत्वाचे, सामर्थ्याचे जनजागरण केले.

श्री समर्थांनी आपले सद्गुरु, आपले स्वामी प्रभू रामचंद्रांचे अनेक प्रकारे, अनेक ठिकाणी स्तवन केलेले आहे. वेगवेगळ्या ग्रंथरचनेत-स्फुटरचनेत त्यांनी रामचंद्रांचा महिमा गायलेला आहे. रामभक्तिभावाचे हे समर्थकृत विविधरंगी इंद्रधनू मोठे विलक्षण आहे. या सर्व रामस्तुतीपर रचना मुळातूनच वाचणे एक आनंददायक गोष्ट आहे. १) समर्थकृत ओवी शतकांतील एक शतक रामचरित्रपर आहे. २) एकवीस समासीत रघुनाथध्यान (समास क्र. २) आणि रघुनाथचरित्र (समास क्र. १५) असे दोन समास आहेत. ३) सगुणध्यान व निर्गुणध्यान अशी दोन प्रकरणे ४) रामायणपर १४६२ ओव्यांची दोन कांडं, सुंदरकांड व युद्धकांड. असे त्यांचे बहुतांश साहित्य रामरंगी रंगलेले रामरूप आहे. श्रीरामचंद्रांचे नाम, वर्णन, भक्ती, उपासना, चरित्र या गोष्टी समर्थांनी विशद करतानाच अनेक ठिकाणी रामकृपेचे वर्णन केलेले आहे. आपल्या सर्व साहित्यकृतीचे - रचनांचे श्रेय प्रभू रामचंद्रांच्याच चरणी अर्पण केलेले आहे. ‘कास या रघुनाथाची। धरिता सुख पावलो।’ या नाशिक पंचवटीत रचलेल्या एका पदात समर्थ म्हणतात-

१) हे ज्ञान रामकृपेने। धन्य राम उपासना।
रामदास्य घडे ज्याला। ते सर्वत्र रामदास हो॥
२) रामराजा दयासिंधु। वोळला सेवकावरी।
रामदासी ब्रह्मज्ञान। सारासार विचारणा॥


समर्थांनी ज्या विविध प्रकारच्या विपुल रचना केल्या, त्या वेगवेगळ्या नाममुद्रेने केलेल्या आहेत. ‘रामदास म्हणे’, ‘दास म्हणे’ प्रमाणेच आपणास ‘रामी रामदास’, ‘देवदास’, ‘राघव’, ‘निजदास’, ‘कवी’ अशाही नाममुद्रा आढळतात. ‘दासविश्रामधामा’मध्ये समर्थांच्या ३६ नाममुद्रांची नावेच दिलेली आहेत. त्यात वरील नाममुद्रांशिवाय ‘बंदे’, ‘जिंदे’, ‘फकीर’, ‘रसिक’, ‘भक्त’, ‘गण’ अशा नाममुद्रांचा उल्लेख आहे.

राघवाचा धर्म जागो

संत रामदासांनी प्रभू रामचंद्रांचा वेगवेगळ्या विशेषणांनी स्तुती, गौरव केलेला आहे. त्यातील समर्थांचे आवडते - लाडके विशेषण म्हणजे ‘सूर्यवंशाचे मंडण’ पुढील दोन अभंग चरण पाहा-

सूर्यवंशाचे मंडण। रामदासाचे जीवन॥ अभंग गाथा (९/३)
सूर्यवंशाचे मंडण। रामदासाचे भूषण॥ (गाथा ११/४)


संत ज्ञानदेवांनी एका अभंगात ‘धर्म जागो निवृत्तीचा’ असे म्हटले आहे. या चरणातील ‘निवृत्ती’ शब्द गुरू निवृत्तीनाथ वाचक आहे. संत ज्ञानदेवांप्रमाणेच समर्थ रामदास ‘धर्म जागो राघवाचा।’ अशी साद घालतात. या वेगवेगळ्या शब्दावलीत वरवर भेद दिसत असला तरी त्यांचा भाव एकच आहे आणि तो काहीसा कालसापेक्ष आहे. निवृत्तीनाथांचा आणि राघवांचा धर्म हा मूलतः भागवत धर्मच आहे. या भागवत धर्मालाच समर्थांनी ‘महाराष्ट्र धर्म’ म्हटले आहे. संत ज्ञानदेवांचे ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत।’ या ओवीतील विश्वात्मक भाव आणि समर्थांच्या ‘नारायण असे विश्वी। त्याची पूजा करीत जावी।’ या ओवीतील वैश्विकभाव एकच आहे.
‘हे महाराष्ट्राचे खरे नाथ होय।’ अशा शब्दात न्या.रानडे यांनी ज्यांचा गौरव केला, ते संत एकनाथ आणि समर्थ रामदास यांच्या कार्यातील एक समानसूत्र म्हणजे प्रभू रामचंद्र! संत एकनाथ हे संत रामदासांच्या मावशीचे पती होते, असा त्यांचा नातेसंबंध सांगतात. समर्थांचे मामा, कीर्तनकार भानजी गोसावी हे संत एकनाथांचे अनुग्रहित होते. (संदर्भ ः सुनील चिंचोळकर ः चिंता करिता विश्वाची ). ‘हनुमंतस्वामींची बखर’ मध्ये सूर्याजीपंत आपल्या दोन्ही मुलांना (श्रेष्ठ व समर्थ) घेऊन पैठणला संत एकनाथांच्या समाधी दर्शनास गेल्याचे बखरकार म्हणतात.
 
समर्थ व संत एकनाथ यांच्यातील साम्याचा आणखी एक वाङ्मयीन दुजोरा म्हणजे - संत एकनाथांनी ‘भावार्थ रामायणा’त ‘देवबंधमुक्ती करणारा योद्धा राम’ शब्दांकित केलेला आहे आणि तो वाल्मिकी रामायणातील रामापेक्षा वेगळा आहे. समर्थांनीही आपल्या रामायणात सीतामुक्तीऐवजी रावणाच्या कैदेतील देवांची बंधमुक्ती करणारा रामच साकारलेला आहे.

फेडावया देवाची साकडी। स्वधर्म वाढवावया वाढी।
नामे मोक्षाची उभवावया गुढी। सूर्यवंशा गाढी दशा आली॥
तोडी नवग्रहाची बेडी। सोडवी देवांची बांधवडी।
उभवी रामराज्याची गुढी। आज्ञा धडपुडी तिही लोकी।

‘देवबंधमुक्ती’ ही संकल्पना संत एकनाथांची, ती समर्थांनी अधिक ठळकपणे पुरस्कारली. या संदर्भात काही संशोधक - अभ्यासकांची मते पाहा - डॉ. रा. चिं. ढेरे म्हणतात - “संत एकनाथांची भावार्थ रामायणातील राम-चरित्रामागची भूमिका, समर्थांनी पुरस्कारलेली होती. देवांच्या बेड्या तोडणारा आणि रामराज्याची गुढी उभारणारा संत एकनाथांचा ‘राम’च समर्थांच्या हृदयात ठाण मांडून राहिला होता. (संदर्भः विविधा)” आणखी एक थोर चिंतक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, “समर्थांच्या आई राणूबाई यांच्या माहेरी संत एकनाथांचा भक्तिसंप्रदाय होता. त्याचा प्रभाव लहान नारायणावर पडून घरचा रामोपासनेचा ठसा अधिक दृढ बनला. त्यामुळे पुढे रामदास हे एकनाथांचेच अवतार होत, असे संप्रदायात म्हणू लागले.

(संदर्भ ः महाराष्ट्रधर्माचे प्रणेते)” डॉ. वसंत स. जोशी यांनीही ‘समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड सुवर्णमहोत्सव विशेषांकातील लेखात (पान क्र.२१०)अशाच आशयाचा विचार मांडलेला आहे. वि. ल. भावे, महाराष्ट्र सारस्वत (पान २०६) म्हणतात - “तुलसीदास, कबीर इत्यादी साधू रामाचेच भक्त होते. पण, त्यांच्या रामाचा स्वीकार रामदासांनी केला नाही. त्यांना काही कारणास्तव रामाच्या विशिष्ट स्वरूपाचा अवलंब करावासा वाटला म्हणून रामभक्तीचे इतर पंथ विद्यमान असताही त्यांनी आपला नवीन रामदासी संप्रदाय स्थापन केला.” पण, या विधानाला समर्थ रामदासांचीच एक रचना पूर्ण छेद देणारी आहे. ‘म्हणोनि आम्ही रामदास। सगुणध्यान’ रचना सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्यामध्ये ‘स्वरूप संप्रदाय अयोध्यामठ।’ असा स्वरूप संप्रदायाचा सुस्पष्ट उल्लेख आहे. ‘रामदासांचा रामभक्ती पंथ प्रकाश, आनंद, स्वरूप आणि चैतन्य या संप्रदायांपेक्षा निराळा आहे,’ असे वि. का. राजवाडे - भावे म्हणतात ते एकांगी आहे.

विद्याधर ताठे


(पुढील अंकात ः संत रामदास स्वामींचा ‘रघुवीर समर्थ ’भाग चौथा)

Powered By Sangraha 9.0