५०० रुपयांपर्यंतचे व्यवहार रोखीनेच; सर्वेक्षणातून बाब समोर!
09 Jul 2024 18:50:13
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेमुळे देशांतर्गत डिजिटल व्यवहारांना मोठी चालना मिळाली आहे. यात आता एक सर्वेक्षणाच्या माध्यमातून डिजिटल इंडियाच्या यशस्वितेचा पुरावा देणारा नवा डेटा समोर आला आहे. दरम्यान, ५०० रुपयांखालील व्यवहारांकरिता रोखीचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे.
५०० रुपयांपेक्षा अधिकच्या व्यवहारांकरिता डिजिटल पेमेंटचा उपयोग केला जात आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच युपीआयसारख्या डिजिटल पेमेंट पध्दतीचा वापर करून ५०० रुपयांहून अधिकचे व्यवहार डिजिटलरीत्या करण्यात येत आहे. उलटपक्षी, ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या तिकीट व्यवहारांसाठी रोखीने व्यवहार करण्यास प्राधान्य दिले जात आहे, असे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
विशेष म्हणजे व्यवहार मूल्य वाढल्याने क्रेडिटचा वापर वाढत असून ५०० ते १,९९९ रुपयांमधील व्यवहार मूल्यांसाठी युपीआय डिजिटल पेमेंटला पसंती कायम आहे. महत्त्वाचे म्हणजे ४७ टक्के व्यक्ती डिजिटल व्यवहारांसाठी युपीआय पेमेंट पद्धतीला प्राधान्य देतात, असे 'Kearney India', 'Amazon Pay India' च्या 'How Urban India Pays' अहवालात म्हटले आहे.