जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क रहा! मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला दिली भेट

    08-Jul-2024
Total Views |

Shinde
 
मुंबई : राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, दि. ८ जुलै रोजी दिले. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली.
 
यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव इकबालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  अधिवेशनालाही अतिवृष्टीचा फटका! दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब
 
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "राज्यासह मुंबईत पाऊस सुरु आहे. एकत्रित मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने राज्यात काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी सर्व जिल्हास्तरावरील टीम एकत्रित काम करत आहेत. या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा प्रभावित झालेली आहे. लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एसटीसह बेस्टच्या सेवा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याकरिता मुंबई महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पावसामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये," असे आवाहन त्यांनी केले.
 
कोकण आणि मुंबईसह उपनगरात अतिवृष्टीमुळे जागोजागी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक मनपा कर्मचाऱ्यांनीदेखील गरजेच्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचवण्याबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी निर्देश दिले. तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांना पाचारण करावे, असेही निर्देश स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत.
 
मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी पावसामुळे बाधित झालेल्या रस्त्यांची माहिती घेतली. वाहतूक चालू रहावी, ज्या सखल भागात पाणी साचले आहे तिथे पंप लावून पाणी काढून टाकावे, जिथे रेल्वे सेवा बाधित झाली आहे तिथे बेस्ट बसेसची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी असेही सांगितले.