मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र मोठा फटका बसला आहे. दरम्यान, गरज असेल तरच घराबाहेर पडा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागरिकांना दिल्या आहेत. तसेच लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत."
हे वाचलंत का? - मुंबई तुंबली! सहा तासांत ३०० मिमी पाऊस, यलो अलर्ट जारी
"सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे," असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली असून अनेक घरांत पाणी शिरले आहे.