मुंबई : मुंबईतील नालेसफाई कामांची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सोमवारी सभागृहात केली आहे. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत सर्वत्र पाणी साचले असून त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. हा मुद्दा आज सभागृहात उपस्थित करण्यात आला होता.
याविषयी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, "ज्यावेळी मुंबईतील सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या कामात होते, त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे कंत्राटदाराने योग्य कामे केली नाहीत. त्यामुळे नाल्यातील गाळ पुर्ण निघाला नाही. काढलेला गाळ उचलला गेला नाही, त्यामुळे मुंबईच्या नालेसफाईची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.
मुंबईसह महानगर प्रदेशात सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात घोषणा केली.