कळवा रुग्णालय वादात

जून महिन्यात 21 नवजात शिशू दगावले

    06-Jul-2024
Total Views |

kalwa
ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या वर्षी एकाच दिवशी 18 रूग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. आता रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात जून महिन्यामध्ये 21 नवजात शिशूंचा मृत्यू झाल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, सिव्हील रुग्णालय स्थलांतरित झाल्याने तसेच भिवंडी, मुरबाड, शहापूर, कल्याण भागांत ‘एनआयसीयू’ची सुविधा नसल्याने कळवा रुग्णालयावर ताण येत असल्याचे दिसून येत आहे.
 
ठाणे महापालिकेच्या या रुग्णालयात उपचाराच्या चांगल्या सोयीसुविधा असल्यामुळे जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण अणि दुर्गम आदिवासी भागातून रुग्ण येतात. अशातच बाळंतपणासाठीदेखील गर्भवती महिला मोठ्या संख्येने येतात. जून महिन्यात 512 महिला प्रसूतीसाठी आल्या होत्या. यातील 294 गर्भवतींचे सी-सेक्शन करण्यात आले. तर, 90 बालकांना जन्मल्यानंतर अतिदक्षता विभागात ठेवले होते. यापैकी 21 नवजात शिशूंचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.
ही आहेत कारणे
कळवा रुग्णालयात ज्या शिशूंचा मृत्यू झाला आहे, त्याची अनेक कारणे आहेत. काहीवेळा खासगी रुग्णालयात बाळाला वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, गंभीर अवस्थेत आपल्याकडे आणले जाते. तर ग्रामीण, दुर्गम भागातील गर्भवती महिलेचे बाळंतपण एकदम जोखमीचे असल्यावर, शेवटच्या घटकेला रुग्णालयात आणले जाते. या संबंधित बहुतांश शिशू असे आहेत, ज्यांना गोल्डन मिनिट म्हणजे जन्मानंतर लगेचच उपचार मिळाले नाहीत. मुलांना आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापर्यंत, मौल्यवान वेळ आधीच वाया गेला आहे. अशी बाळं वाचवण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या फारसे काही केले जाऊ शकत नाही, असे कळवा रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी स्पष्ट केले.