कलेचे रसग्रहण करण्याच्या दृष्टीने रसिकांनीही रियाज करायला हवा : अंबरीश मिश्र
06 Jul 2024 12:44:49
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Abhiruchi Jopasna Karyashala RMP) "कलेचे रसग्रहण करण्याच्या दृष्टीने केवळ कलाकारानेच नव्हे, तर रसिकांनीही रियाज करायला हवा.", असे मत सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकार अंबरीश मिश्र यांनी व्यक्त केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित अभिरुची जोपासना कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवार, दि. ५ जुलै रोजी अंबरीश मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉ. जयंत कुलकर्णी आणि शास्त्रीय संगीताचे अभ्यासक प्रा. केशव परांजपे उपस्थित होते.
यावेळी अंबरीश मिश्र यांनी विविध कला, रसिकता, जीवन यांबाबत आपले विचार मांडले. संत साहित्य, पाश्चात्य कला, हिंदी-उर्दू- इंग्रजी साहित्य यांतील असंख्य संदर्भांसह मिश्र यांनी उपस्थित सहभागींसमोर अभिरुची संपन्नतेविषयी मांडणी केली.
ते म्हणाले, कोणत्याही कलेला किंवा कलाकृतीला जीवनाचा स्पर्श असेल, तरच ती कला किंवा कलाकृती चैतन्यमय आणि रसमय म्हणता येईल. अन्यथा तो एक चैतन्यहीन संगमरवरी दगड असेल. एक भावगर्भ आणि सुंदर वैचारिक मैफल ऐकण्याचा आनंद मिश्र यांच्या भाषणाने दिला, अशी प्रतिक्रिया सहभागींनी व्यक्त केली. राज्यातील ५ जिल्ह्यांतून आलेले एकूण ४८ सहभागी केशवसृष्टी, उत्तन येथे होत असलेल्या तीन दिवसीय कार्यशाळेत उपस्थित आहेत.