भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक : डॉ. मोहनजी भागवत
ऋषिकेश येथे "माधव सेवा विश्राम सदन"चे लोकार्पण
04-Jul-2024
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mohanji Bhagwat at Hrushikesh) "राष्ट्रहितार्थ सेवा कार्य करण्यासाठी आणि भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. ज्यांना भारताचा विकास बघायचा नाही, तेच लोक देश आणि समाजात फूट पाडण्यात मग्न आहेत. तर भारतात राहणारे सर्व लोक एक आत्मा, एक शरीर आहेत. आपण सर्व मनाने एक आहोत.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. ऋषिकेश येथे एम्स रुग्णालयाजवळील 'माधव सेवा विश्राम सदन'चा लोकार्पण सोहळा बुधवार, दि. ०३ जुलै रोजी सरसंघचालकांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
सरसंघचालक उपस्थिततांना संबोधत यावेळी म्हणाले, "देशात असे अनेक महापुरुष आहेत, ज्यांचा प्रत्येकजण आदर करतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद ही अशी उदाहरणे आहेत ज्यांना प्रत्येकजण आपला आदर्श मानतो. आपल्या सर्वांमध्ये हिंदुत्व आहे, फक्त ते ओळखण्याची गरज आहे. ही भावना संस्कृती, विधी, वेशभूषा किंवा इतर कोणत्याही स्वरूपात असू शकते. या भावनेने एकत्र आलो तर राष्ट्राची प्रगती कोणीही रोखू शकत नाही."
पुढे ते म्हणाले, "सेवा हा माणसाचा परम धर्म आहे. आज जनसेवेत जनसंपर्काला महत्त्वाचे स्थान आहे, पण जनसंपर्काचा अभाव असताना जनसेवेचे उद्दिष्ट कसे साध्य होणार. हे घर सेवा आणि समर्पणाचे थेट उदाहरण आहे. उत्तराखंडच्या दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबीयांना याचा मोठा फायदा होणार आहे, हे नक्की. या कार्यातून समाजसेवेचा आदर्श आपण नक्कीच मांडत आहोत."
ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश गोयल यांनी माधव सेवा विश्राम सदन हे मानवसेवेचे माध्यम असल्याचे सांगून भाऊराव देवरस सेवा ट्रस्टमार्फत चालविण्यात येत असलेल्या सेवा प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीही उपस्थित होते.
माधव सेवा विश्राम सदनाविषयी...
भाऊराव देवरस सेवा ट्रस्टने ऋषिकेश एम्सजवळ वीरभद्र मार्गावर चार मजली माधव सेवा विश्राम सदन नव्याने बांधले आहे. विश्रामगृह दोन वर्षांत पूर्ण झाले. १.४० लाख चौरस फूट जमिनीवर या प्रकल्पासाठी ३० कोटी रुपये खर्च आला आहे. ज्यामध्ये सुमारे १५० दानशूर व्यक्तींनी विशिष्ट योगदान दिले आहे. येथे १२० खोल्या असून ४३० बेड्सची सोय करण्यात आली आहे. एम्समध्ये दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना एक फॉर्म भरून दिला जाईल. याच फॉर्मच्या आधारे रुग्णांच्या कुटुंबीयांना निवासाची सोय केली जाईल. त्यांच्यासाठी येथे १० रुपयांत अल्पोपहार व ३० रुपयांमध्ये भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.