मुंबई : पर्यटनाच्या उद्देशाने दक्षिण मुंबईत इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया गाड्या चालवण्यास अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली. मात्र दक्षिण मुंबईत काही परिसरात आवश्यक परवानग्यांची पूर्तता न करता बेकायदेशीर इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया गाड्या धावत आहेत. त्यामुळे या बेकायदेशीर गाड्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी परिवहन आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये पर्यटनाच्या दृष्टीने दक्षिण मुंबईत इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया गाड्या चालवण्यास मान्यता दिली होती. परंतु बेकायदा गाड्यांमुळे हा प्रश्न पर्यटक आणि नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित असल्याने संबधित कंपनी अथवा व्यक्तीने महाराष्ट्र सरकारच्या जीआरच्या अटींचे पालन केले आहे की नाही याची पडताळणी करण्याचे संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाला त्वरित निर्देश द्यावेत. तसेच बेकायदा गाड्या धावत असतील त्या तत्काळ जप्त करण्यासह उचित कारवाई करावी, अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे.