मुंबई,दि.३ : काळाचौकीच्या अभ्युदय नगरचा पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आर्किटेक्टची नियुक्ती करता आली नाही. पण पुढील सात दिवसांत आर्किटेक्टची नियुक्ती करण्यात येईल. त्यानंतर पुढील दोन महिन्यांत पुनर्विकासाचा पूर्ण प्रस्ताव तयार होईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सोमवार, दि.१ रोजी विधानसभेत दिली.
मंत्री सावे म्हणाले, अभ्युदय नगर (काळाचौकी) या म्हाडा वसाहतीचा पायाभूत सुविधांसह समुह पुनर्विकास व योग्य नियोजन करणे शक्य व्हावे, तसेच म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास करताना चांगल्या दर्जाच्या इमारती व सोयीसुविधा उपलब्ध करून देता यावे यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. वसाहतीचा एकत्रित पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने म्हाडाकडून प्राप्त प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. लवकरच बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री सावे यांनी यावेळी सांगितले.