आयुष हॉस्पिटलमध्ये झाली कल्याणातील पहिली यशस्वी रोबोटिक गुडघेरोपण (नी रिप्लेसमेंट) सर्जरी

28 Jul 2024 20:40:01
 
 
hospital
 
 
 
 
 
कल्याण  : कल्याण डोंबिवलीतील वैद्यकीय विश्वामध्ये येथील अग्रगण्य आयुष हॉस्पिटलने एक नवा इतिहास रचला आहे. या रुग्णालयात कल्याणातील पहिली रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी (गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया) यशस्वीपणे करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेसाठी थर्ड जनरेशनच्या कोरी या अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याची माहिती आयुष हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेश राजू आणि ऑर्थोपेडिक - रिप्लेसमेंट सर्जन डॉ.भरत कुमार यांनी दिली आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. ज्यामुळे पूर्वी अतिशय गुंतागुंतीच्या आणि अवघड असणाऱ्या शस्त्रक्रिया आता रोबोटिक्सच्या सहाय्याने सहजपणे होऊ लागल्या आहेत. त्यापैकीच एक ही रोबोटिक नी रिप्लेसमेंट अर्थातच गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. रुग्णांना यासाठी आधी मुंबई आणि नंतर ठाण्यातील रुग्णालयांमध्ये जावे लागायचे. मात्र कल्याण पश्चिमेतील आयुष हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रियेसाठी लागणारे अत्याधुनिक कोरी हे रोबोटिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांचा त्रास आणि वेळ या दोन्हींची बचत होणार असल्याचे डॉ. राजू आणि डॉ. कुमार यांनी सांगितले.
तर या रोबोटिक शस्त्रक्रियेचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की यापूर्वीच्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत या प्रगत तंत्रज्ञानामुळे नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये 99.5 टक्के इतकी अचूकता आली आहे. तसेच ही शस्त्रक्रिया करताना रुग्णाच्या गुडघ्यातील कमीतकमी मांसपेशींचे नुकसान होण्यासह रक्तस्त्रावही कमी होतो. या शस्त्रक्रियेतील अचूकता वाढल्याने शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाची रिकव्हरी ही पूर्वीपेक्षा अधिक वेगाने होत असल्याचेही या दोन्ही डॉक्टरांनी यावेळी अधोरेखित केले.
तर आर्थिक खर्चाच्या बाबतीत विचार केल्यास रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीला (गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया) जवळपास पारंपरिक शस्त्रक्रियेएवढाच खर्च येतो. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे शस्त्रक्रियेतील अचूकता वाढण्यासोबतच रुग्ण बरे होण्यासाठी पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा कमी कालावधी लागत असल्याचेही डॉ. राजेश राजू आणि डॉ. भरत कुमार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान कल्याण डोंबिवलीतील पहिली यशस्वी रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी (गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया) करून कल्याणातील आयुष हॉस्पिटलने नवा अध्याय रचला असून कल्याण,डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, टिटवाळा आदी भागातील रुग्णांना आता यासाठी ठाणे मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही.
 
 
 
Powered By Sangraha 9.0