अमरावती : जगन मोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे पाब्लो एस्कोबार आहेत, असा घणाघात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर केला. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेत एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आणि दावा केला की रेड्डी यांच्या राजवटीत आंध्र प्रदेश देशाची "गांजा राजधानी" बनली होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “पाब्लो एस्कोबार हा कोलंबियाचा ड्रग लॉर्ड आहे, तो नार्को दहशतवादी आहे. तो राजकारणी बनला आणि मग त्याने ड्रग्ज विकण्याचे कार्टेल सुरू केले. त्यावेळी त्याने ३० बिलियन डॉलर्स कमावले होते, आता त्याची किंमत ९० बिलियन डॉलर्स आहे. १९७६ मध्ये त्याला अटक करण्यात आली आणि १९८० मध्ये तो जगातील सर्वात श्रीमंत ड्रग माफिया बनला.
ड्रग्ज विकूनही माणूस श्रीमंत होऊ शकतो. माजी मुख्यमंत्री (वायएस जगन) यांचे उद्दिष्ट काय होते?” ते पुढे म्हणाले, “टाटा, आणि अंबानी यांच्याकडे पैसा आहे आणि रेड्डी यांना त्यांच्यापेक्षा श्रीमंत होण्याची इच्छा होती. काहींना गरजा आहेत, काहींना लोभ आहे आणि काहींना उन्माद आहे आणि हे वेडे अशा प्रकारच्या गोष्टी करतात.”
टीडीपीने आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुका तसेच लोकसभा निवडणुका भाजप आणि जनसेना पक्षासोबत मिळून लढल्या होता. या आघाडीने जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव केला होता. मुख्यमंत्री नायडू यांनी टीडीपी-भाजप-जनसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विधानसभा तसेच संसदीय निवडणुकीत मोठा विजय मिळवून दिला होता. आंध्र प्रदेशच्या १७५ सदस्यीय विधानसभेत १३५ आमदारांसह टीडीपीकडे बहुमत आहे, तर त्याचा मित्रपक्ष, जनसेना पक्षाकडे २१ आणि भाजपकडे आठ आमदारांचे संख्याबळ आहे. तर वायएसआर काँग्रेस पक्षाचे फक्त ११ आमदार आहेत.