नवी दिल्ली : भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत मागच्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये २८ दहशतवादी मारले गेले आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत दहशतवादाच्या आव्हानाशी संबंधित प्रश्नांना उत्तर देताना दिली. ते म्हणाले की, या चकमकीत आमच्या जवानांचेही बलिदान झाले ही खेदाची बाब आहे. मात्र, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या तुलनेत मृत सैनिकांची संख्या खूपच कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
२००४ ते २०१४ या काळात दहशतवादाच्या ७२१७ घटना घडल्याची आठवण त्यांनी करून दिली. नित्यानंद राय म्हणाले की, याउलट मोदी सरकारच्या कार्यकाळात २०१४ ते जुलै २०२४ पर्यंत २२५९ दहशतवादी घटना घडल्या. मात्र, असे व्हायला नको होते, हे दुःखद असल्याचे त्यांनी सांगितले. नित्यानंद राय यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मोदी सरकारचे दहशतवादाबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण आहे. आम्ही दहशतवाद संपवू” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दहशतवाद्यांची जागा एकतर तुरुंगात असेल किंवा नरकात असेल, असे आश्वासन त्यांनी देशाच्या संसदेला दिले. काँग्रेसप्रणित यूपीए कालखंडाची आठवण करून देताना ते म्हणाले की, १० वर्षात दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांची संख्या २८२९ होती. मोदी सरकारच्या कार्यकाळात हा आकडा ६७ टक्क्यांनी घटून ९४१ वर आला आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील लोक आता शांततापूर्ण वातावरणात जगत आहेत, सुरक्षेची पूर्ण हमी आहे.
ते म्हणाले की, काश्मीरमध्ये हिंदूंवर खूप अत्याचार झाले, त्यांची कत्तल झाली आणि महिलांवर बलात्कार झाले, एका कटाचा एक भाग म्हणून घृणास्पद राजकारणाच्या आधारे काश्मिरी पंडितांना पलायन करण्यास भाग पाडले. काश्मीरमधील विस्थापित सरकारी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी ६००० घरांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी २०८८ घरे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, विस्थापित हिंदूंचे पुनर्वसन आणि त्यांना नोकऱ्या देण्याचे काम सुरू आहे.