मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी विधानसभेत स्वबळावर २५० जागा लढण्याची घोषणा केली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, "निवडून येण्याची तयारी आणि क्षमता असणाऱ्या लोकांनाच तिकीटं दिली जातील. तिकीट मिळालं की, मी पैसे काढायला मोकळा, असं म्हणणाऱ्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही. तुम्ही जे बोलाल, जे सांगाल आणि जी माहिती द्याल ती प्रामाणिकपणे द्या. कारण तुम्ही दिलेली माहितीही तपासली जाणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणूकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोक काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत."
हे वाचलंत का? - "लाडकी बहिण, लाडका भाऊ एकत्र राहिले असते तर पक्ष टिकला असता!"
"तुम्ही जे बोलाल, सांगाल, जी कोणतीही माहिती द्याल, ती माहिती नीट द्या. प्रामाणिकपणे द्या. तुम्ही दिलेली माहितीही चेक केली जाणार आहे. तुमच्यापर्यंत ही लोकं येतील. मग कोणती युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असा कोणताही विचार मनात आणू नका. जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत. सर्व गोष्टी चेक करणार आहोत. आम्ही सगळेच तयारीला लागलो आहोत," असे ते म्हणाले. तसेच १ ऑगस्टपासून मी महाराष्ट्र दौरा सुरु करणार आहे, असे सांगत राज ठाकरेंनी सर्वांना निवडणूकीच्या तयारीला लागा, असे आवाहनही केले आहे.