मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Kargil Vijay Diwas) भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केन्द्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि वर्धमान नगर येथील व्हीएमव्ही वाणिज्य, जे.एम.टी. कला आणि जे.जे.पी. विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ व २७ जुलै रोजी महाविद्यालय प्रांगणात 'कारगिल विजय दिवस - रौप्य जयंती' या विषयावर दोन दिवसीय मल्टिमीडिया फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कारगीलच्या युद्धात आपल्या शौर्य आणि पराक्रमाने भारताला विजय मिळवून देणाऱ्या शूर सैनिकांच्या सन्मानार्थ हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
शनिवार, २७ जुलै रोजी समारोप सत्रात निवृत्त मेजर जनरल एपी बाम, (सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल) कार्यक्रमाची शोभा वाढवतील. ते आपल्या ओजस्वी विचारांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करतील. या वेळी नागपूर गुजराती मंडळाचे महासचिव अधिवक्ता संजयभाई ठाकर या सत्राची अध्यक्षता करतील. अतिथींच्या हस्ते चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येतील.
या छायाचित्र प्रदर्शनात कारगिल युद्धाशी संबंधित दुर्मिळ छायाचित्रे पाहायला मिळतील, तसेच युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यासह इतर सैनिकांबद्दल आणि युद्धात वापरलेल्या शस्त्रास्त्र व उपकरणांबद्दल प्रेरणादायी माहितीही दर्शकांना मिळेल.हे प्रदर्शन सर्व विद्यार्थी आणि नागरिकांसाठी नि:शुल्क उपलब्ध असेल.