पुणे : मुंबई आणि पुणे शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील उच्च माध्यमिक मंडळाची इयत्ता बारावीची पुनर्परीक्षा सध्या सुरु आहे. दरम्यान काही विद्यार्थांना पावसामुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला. त्यामुळे राज्यभरातील पावसाची एकूण परिस्थिती लक्षात घेता, ही अडचण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर यांना सांगितली असता जे परिक्षार्थी आजच्या पेपरसाठी पोहोचू शकणार नाहीत,
अशा परिक्षार्थींसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुण्यासह राज्यभरासाठी असणार आहे. या संदर्भातील लेखी निर्णय लवकरच प्रसिद्ध होईल, अशी माहिती त्यांनी दिली. जे परिक्षार्थी पोहोचू शकले नाहीत, त्यांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, अशी विनंती मोहोळ यांनी विद्यार्थांना केली.