महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांतील दोष दूर करावे, अशी विनंती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी असल्याने राज्यातील सुमारे १० टक्के मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले, बावनकुळेंनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार तसेच माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यात सुमारे सव्वा तास चर्चा झाली. यावेळी बावनकुळेंनी निवेदन दिले असून राज्यातील बुथ व मतदार यादीत असणाऱ्या त्रुटीबद्दल माहिती देताना २०१९ साली मतदारसंघात असणारी दीड लाख मते २०२४च्या लोकसभा निवडणुकीत नव्हती, असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
मतदार यादी करा एक हजारांची
मतदार याद्या तयार करताना डाटा एन्ट्रीच्या परिस्थितीविषयी माहिती दिली. सोबतच एका बुथवरील मतदार यादी एक हजार मतदारांची करावी अशी विनंती केली. सोबतच वयोवृद्ध मतदारांचे वय ८५ वरून ७५ करण्यात यावे तसेच हाऊसिंग सोसायटीमध्ये १०० टक्के बुथ लावण्याची मागणी केली असून एकाच इमारतीतील बुथ शेजारी लावण्यात यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
आयुक्तांचे त्रुटीवर लक्ष!
बुथ लेव्हलच्या अधिकाऱ्यांकडून चुका झाल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या लक्षात आले असून फोटो नसल्याने अनेकांना मतदान करता आले नाही, हे देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणूक चांगली होईल व मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता येईल, अशी अपेक्षा बावनकुळेंनी व्यक्त केली.