बाबा बैद्यनाथ धाम येथे लाखो भाविक दाखल; गर्दी व्यवस्थापनासाठी पहिल्यांदाच 'AI'चा वापर
23 Jul 2024 17:55:07
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Baba Baidyanath Dham) श्रावण महिन्यात झारखंडच्या बाबा बैद्यनाथ धाम येथे देशभरातून लाखो भाविक भगवान शंकराकडे प्रार्थना करण्यासाठी येत असतात. शिव आशीर्वाद प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या कावड यात्रेलाही नुकतीच सुरुवात झाल्याने याठिकाणी भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
बाबा बैद्यनाथ धाम हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. संपूर्ण वातावरण हर-हर महादेवाने दुमदुमत आहे. पहाटेपासूनच भाविक शिवलिंगाला गंगाजल अर्पण करत आहेत. भगवान शंकरावर जलाभिषेक करण्यासाठी बिहार ते बाबा बैद्यनाथ धाम असे सुमारे १०५ किमी चालत अनेक कंवारिया याठिकाणी पोहोचले आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. झारखंड सरकार प्रथमच श्रावण मेळ्यात गर्दी व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, एआय-आधारित तंत्रज्ञान आणि साधने वापरत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांची प्रत्यक्ष माहिती कळणार आहे.