चार वेळा मुख्यमंत्री होते तरी शरद पवारांनी मराठा आरक्षण का दिले नाही?

21 Jul 2024 20:35:23
 sharad pawar
 
पुणे : शरद पवार हे स्वत: चार वेळा मुख्यमंत्री होते. मात्र, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही असा प्रश्न करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीकास्र सोडले. या महाअधिवेशनात बोलतांना त्यांनी भारतीय जनता पक्षाने मराठा आरक्षणाबाबत नेहमीच भूमिका स्पष्ट केल्याचे नमूद करून मराठा समाजातील गरीबांना आरक्षण मिळाले पाहिजे, असे सांगितले, मराठा आरक्षणाची ही लढाई १९८२ मध्ये सुरू झाली होती, अण्णासाहेब पाटील यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना आरक्षण मागितले होते. मात्र, त्यांनी त्यावेळी नकार दिला होता. तेव्हापासून आजपर्यंत राज्यात अनेक सरकारे आली. शरद पवार हे स्वत: चार वेळा मुख्यमंत्री होते. मात्र, त्यांनी आरक्षण दिले नाही.
 
उद्धव ठाकरेंमुळे मराठा आरक्षण टिकले नाही
आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. आणि ते आरक्षण उच्च न्यायालयात टीकवले देखिल होते. मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले होते मात्र, जोपर्यंत आम्ही सत्तेत होतो, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने तीनवेळा मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. पण दुर्देवाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले आणि मराठा आरक्षण रद्द करण्यात आल्याचेही फडणवीसांनी सांगितले.
 
मराठा आरक्षणावरून राजकारण करणे दुर्दैवी आहे. राज्यात पुन्हा एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर आम्ही मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. आज त्याचा फायदा मराठा समाजाला होतो आहे. राज्यात पोलीस भरती सुरू आहे. हजारो मराठा तरुणांना त्यामुळे नोकरी मिळत आहे, असे ही ते म्हणाले.
 
आरक्षणाबाबत मविआची दुटप्पी भूमिका
राज्यात मराठा आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू आहे. माझे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांना आवाहन आहे की, त्यांनी आधी मराठा आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट करावी. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणे मंजूर आहे का, हे त्यांनी आधी सांगावे. आम्हाला शिव्या खाण्याची सवय आहे. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, महाविकास आघाडीचे तिन्ही नेते आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेत आहेत, असे ही ते यावेळी म्हणाले.
 
भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष असणार आहे. आपल्याला आगामी लोकसभा निवडणुकीत चागले काम करावे लागणार आहे. भाजप हा निष्ठावंताचा पक्ष आहे. आपण वेगवेगळे मित्र जोडले, ते काहींना आवडले नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे प्रतिनिधीत्व करणारे शिंदे आपल्या सोबत आहेत. अजित पवार आपल्या सोबत आहेत. त्यामुळे भाजप नेतृत्वात राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेत येणार आहे असा विश्वास देखील फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
फेक नॅरेटिव्हला थेट नॅरेटिव्हने उत्तर
डॉ. बाबासाहेबांनी आरक्षण हे काही काळासाठीच दिले होते. ते अटलजींनी वाढविले त्यानंतर मोदीजींनीही ते वाढविले, संविधान बदलणार हा फेक नॅरेटिव्ह लोकसभा निवडणुकीच्या वेळी चालविण्यात आला. ठाकरे सरकारने आवास योजना, मेट्रो, जल शिवार युक्त योजना बंद केल्या. आम्ही लाडकी बहीण योजना सुरु केली. बहिणीचा सन्मान करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेच्या विरोधात महाविकास आघाडी न्यायालयात जाणार आहे.
  
आपली लाडकी बहिण योजना जमिनीवर उतरली पाहिजे. महाविकास आघाडीचे लोकांकडून चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून घेतले जात आहेत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या महिलांचे फॉर्म भरा. कार्यकर्त्यांनो लोकांना मदत करा, त्यांना योजनेची माहिती द्या, सिलेंडरच्या किमती वाढल्या हा एक खोटा नॅरेटिव्ह त्यांनी पसरवला. आपल्याविरुद्ध नरेटीव्ह तयार होतो, पण आपले लोक उत्तर देत नाहीत. आदेशाची वाट बघतात. मी आज आदेश देतो, फुल बॅटिंग करा, आदेश विचारू नका, मैदानात उतरा आणि ठोकून काढा. फक्त बोलताना आपली हिट विकेट पडू देऊ नका, असे आवाहनही फडणवीसांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0