"२०४१ पर्यंत आसाम मुस्लिमबहुल राज्य बनेल"; हिमंता बिस्वा सरमा यांचा दावा

19 Jul 2024 18:10:46
 muslim
 
दिसपूर : "आसाममधील मुस्लिमांची लोकसंख्या येत्या काही वर्षांत खूप वाढणार आहे. त्यामुळे २०४१ पर्यंत आसाम मुस्लिम बहुल राज्य होईल." असा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांख्यिकीय आकडे सादर केले. राज्यातील मुस्लिम लोकसंख्या दर १० वर्षांनी सुमारे ३० टक्क्यांनी वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यानुसार आसाममध्ये २०४१ पर्यंत मुस्लिम बहुसंख्य होतील.
 
सांख्यिकीय नमुन्यांचा हवाला देत ते म्हणाले की, आसामच्या लोकसंख्येच्या ४० टक्के मुस्लिम आहेत. दर दहा वर्षांनी हिंदूंची लोकसंख्या केवळ १६ टक्क्यांनी वाढत असल्याचा दावाही त्यांनी केला. परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की त्यांच्या सरकारने मुस्लिम समुदायातील लोकसंख्या वाढ कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत.
 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, "मुस्लिमांची लोकसंख्या वाढ रोखण्यात काँग्रेसची सर्वात महत्त्वाची भूमिका असू शकते." त्यांनी राहुल गांधींवर ताशेरे ओढले आणि म्हणाले की, जर राहुल गांधी लोकसंख्या नियंत्रणाचे ब्रँड ॲम्बेसेडर बनले तर ही परिस्थिती सुधारेल. ते ही परिस्थिती नियंत्रित करू शकतात कारण हा समुदाय फक्त त्यांचे ऐकतो.
 
Powered By Sangraha 9.0