नुकतेच प्रकाशित झालेले आणि सध्या ऐतिहासिक पुस्तकांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असणारे ‘मराठ्यांचे आरमार द धुळप्स एरा’ या पुस्तकाचे लेखक, संशोधक राज मेमाणे यांच्याविषयी....
पुण्याच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच ज्या परिसराच्या दोन ते तीन किमीच्या परिघात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या, अशा सदाशिव पेठेमध्ये राज मेमाणे यांचे बालपण गेले. त्यांचे शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयामधून (नूमवि) झाले. प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत असताना एखादातरी विषय मनापासून प्रचंड आवडत असतो. तसाच राज मेमाणे यांचा आवडता विषय म्हणजे इतिहास. म्हणूनच इतर विषयांपेक्षा इतिहासामध्येच सर्वाधिक गुण त्यांना मिळायचे. परंतु, पुढे जाऊन इतिहास संशोधक होईन, असे लहानपणी कधीच न वाटलेल्या राज मेमाणे यांचे इतिहास अभ्यास आणि संशोधनाकडे पाऊल पडले, ते 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटामुळे.
‘नूमवि’मध्ये शिक्षण झाल्यानंतर पदवी घेण्यासाठी राज मेमाणे यांनी एसपी महाविद्यालयात प्रवेश घेतला. एसपी महाविद्यालयात ‘राज्यशास्त्र’ हा विषय घेऊन त्यांनी कला शाखेची पदवी मिळवली. इतिहासाची प्रचंड आवड त्यांना महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेऊन जोपासायची होती. मात्र, त्यावेळी महाविद्यालयात इतिहासाचे पदवीचे शिक्षण देणारे शिक्षकच नसल्यामुळे त्यांनी ‘राज्यशास्त्र’ विषय घेऊन आपली पदवी पूर्ण केली. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर व्यावसायिक रंगभूमीपासून अनेक छोटे - मोठे व्यवसाय करायचे प्रयत्न त्यांनी केले. परंतु, इतिहास संशोधक म्हणून वाटचाल सुरु झाली ती, 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटामुळे. चित्रपटाच्या प्रारंभी दाखविलेल्या मोडी लिपीतील स्क्रीनमुळे त्यांनी मोडी लिपी शिकायची इच्छा मनोमन बांधली. प्रसिद्ध इतिहास संशोधक ग. ह. खरे यांच्या नातेवाईकांकडून त्यांना ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’मध्ये मोडी लिपीचे वर्ग घेतले जातात, असे कळले. त्यानंतर राज मेमाणे यांनी मंडळातच मंदार लवाटे यांच्याकडे मोडी लिपीचे वर्ग लावले. दि. 9 जानेवारी 2016 या दिवशी त्यांचा मंदार लवाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोडी लिपीच्या अभ्यासाला आणि त्यामुळे एकूणच इतिहास संशोधनाच्या प्रवासाला गती मिळाली.
“मराठा साम्राज्याच्या कालावधीचा अभ्यास करावयाचा असल्यास मोडी लिपीशिवाय पर्याय नाही, मोडी लिपीचा अभ्यास हा वर्तमान आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाला जोडणारा पूल आहे,” असे ते ठामपणे सांगतात. सन 2016 ते आजपर्यंत म्हणजेच 2024 सालच्या जुलै महिन्यापर्यंत त्यांची एकूण सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ही सर्व पुस्तके अप्रकाशित मोडी कागदपत्रांवर आधारित असल्यामुळे त्यांनी इतिहास संशोधन क्षेत्रात एक वेगळेच नाव कमावले. ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’त घेतलेल्या मोडी लिपीच्या प्रशिक्षणानंतर राज मेमाणे यांनी पुणे विद्यापीठामधून डॉ. गिरीश मांडके यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागात मोडी लिपीची एक पदविका पूर्ण केली आणि त्यामध्ये 2016 साली ते पूर्ण विद्यापीठामधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर राज मेमाणे यांनी मंदार लवाटे यांच्या सांगण्यावरून पुणे पुरालेखागारमधील पेशवे दफ्तरामध्ये असणारे मराठाकालीन अप्रकाशित मोडी कागद शोधण्याचा प्रयत्न सुरू केला.
मोडी भाषेतील संशोधनानंतर 2018 साली त्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा कौलनामा असणारे एक पत्र प्रसिद्ध केले. त्यांची मराठ्यांच्या इतिहासावर आधारित आतापर्यंत एकूण सहा पुस्तके प्रकाशित झाली असून, ही सर्व पुस्तके अप्रकाशित मोडी कागदपत्रांवर आधारित आहेत. यामध्ये पेशवेकालीन जेजुरी, पेशवेकालीन पंढरपूर, महाराजांचे गडदुर्ग खंड-1, देवगिरीची लढाई 1763, मोडी कागदपत्रांमधील दावडी निमगाव आणि नुकतेच प्रकाशित झालेले ‘मराठ्यांचे आरमार - द धुळप्स एरा’ या पुस्तकांचा समावेश आहे. त्याचबरोबर, नानासाहेब पेशवे, सदाशिवरावभाऊ पेशवे आणि नारायणराव पेशवे यांचे अप्रकाशित शिक्के आणि ऐतिहासिक कागदपत्रांमधील ब्रह्मसंबंधांची हकिकत हे अत्यंत महत्त्वाचे आणि इतिहास संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणात भर घालणारे शोधनिबंधसुद्धा त्यांनी सादर केले आहेत, तर आगामी काळात त्यांची ‘छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे गडदुर्ग-2’ आणि ‘ऐतिहासिक कागदपत्रांमधील भुतावळ’ ही दोन पुस्तके प्रकाशित होणार आहेत.
आतापर्यंत केलेल्या इतिहास संशोधनात अप्रकाशित कागदपत्रे लोकांसमोर आणायचा नेहमीच त्यांचा प्रयत्न राहिला आहे. “इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, वासुदेव वामनशास्त्री खरे, रियासतकार सरदेसाई, ग. ह. खरे इत्यादी अनेक थोर व महान इतिहाससंशोधकांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न नेहमी मी करत आलो आहे आणि पुढेदेखील करणार आहे,” असे ते म्हणतात. या इतिहासकारांनी आपल्या महान कार्यातून कधीही पूर्ण न होणारे इतिहासाचे मंदिर उभे केले आहे. त्यात भर घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते आवर्जून सांगतात. “वर्तमानात इतिहासाच्या मोठ्या प्रमाणात होणार्या मोडतोडीला जसे इतिहास अभ्यासक जबाबदार आहेत, तशीच समाजमाध्यमांवर आलेला इतिहास शहानिशा न करता पुढे न पाठवणे, ही सामान्य माणसांचीसुद्धा जबाबदारी आहे,” असे ते सांगतात. तर तटस्थ राहून आतापर्यंत प्रकाशित न झालेला इतिहास लोकांसमोर सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करणार्या मोडी लिपी तज्ज्ञ आणि इतिहास संशोधक राज मेमाणे यांना पुढील संशोधनासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!
अनीश कुलकर्णी
(अधिक माहितीसाठी संपर्क - 9423701849)