मुंबई : मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा 'मुंज्या' हा चित्रपट सध्या तुफान चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी पार करत नवा इतिहास देखील रचला. यानंतर त्यांचा 'काकुडा' हा चित्रपट आहा जिओ सिनेमा या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झाला असून या हॉरर-कॉमेडी चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत आहेत. दरम्यान, सोनाक्षीने पहिल्यांदाच आदित्य यांच्यासोबत काम केले असून मराठी दिग्दर्शकासोबत काम करण्याचं महत्वाचं कारण तिने सांगितलं आहे.
'काकूडा' या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत असून तिने दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचं कौतुक केलं आहे. तिनं याआधी कधीच विनोदी भयपटात काम केलं नव्हतं. पण आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'झोंबिवली' हा मराठी चित्रपट तिनं पाहिला आणि तो आवडल्यामुळेच त्याच्याबरोबर काम करायची तिची इच्छा होती आणि म्हणूनच तिनं 'काकूडा' या चित्रपटासाठी होकार दिला असे ती म्हणाली.
'काकूडा' विषयी सोनाक्षी म्हणाली की, “मला भयपट पाहायला फारसं आवडत नाही. मात्र, मला झोंबीस असणारे प्रकारचे चित्रपट खूप आवडतात. त्यामुळे विनोदी भयपटात काम करणं कसं जमेल? अशी शंका खरतर माझ्या मनात होती. झोंबीचं कथानक असलेला आदित्यचा 'झोंबिवली' हा मराठी चित्रपट मी पाहिला. मला तो चित्रपट खूप आवडला. त्यामुळे आदित्यच्या दिग्दर्शनाखाली काम करायची इच्छा निर्माण झाली. मी 'काकुडा'ची कथा वाचतानाच मला मजा वाटत होती. भयपटाला विनोदाची जोड देत ती कथा रंगवली होती. हा प्रकार नवीन असल्यानं मला त्यात रस वाटला. सगळ्या गोष्टी उत्तम जुळून आल्या आणि म्हणून मी 'काकूडा' चित्रपटासाठी होकार दिला.”