विकास अधोरेखित करणारी गंगाजळी

15 Jul 2024 21:23:25
editorial on foreign exchange raised


भारताच्या विदेशी गंगाजळीने परवा विक्रमी पातळी गाठली. भारतीय अर्थव्यवस्थेवर जगभरातील वित्तीय संस्थांनी शिक्कामोर्तब केल्यामुळे, विदेशी गुंतवणुकीचा देशातील ओघ वाढला आहे. त्यामुळे मध्यवर्ती बँकेकडील विदेशी चलनसाठादेखील वधारला. जागतिक पातळीवर अस्थिरता उद्भवली, तरीही देशावर त्याचा फारसा विपरित परिणाम होणार नाही, याची खात्री देणारी विदेशी गंगाजळी म्हणूनच महत्त्वाची!

'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या ताज्या आकडेवारीनुसार, 5 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात भारताची विदेशी गंगाजळी 5.16 अब्ज डॉलरने वाढून 657.16 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. परकीय चलन मालमत्तेत झालेल्या वाढीमुळे देशाच्या गंगाजळीत वाढ झाली असून, आठवडाभरात त्यात 4.22 अब्ज डॉलरची वाढ नोंदवली गेली. यापूर्वी 7 जून रोजी संपलेल्या आठवड्यात 656 अब्ज डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठला गेला होता. पुनर्मूल्यांकन आणि आवक यांच्या संयोगामुळे साठा वाढल्याचे अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे. ‘जेपी मॉर्गन’च्या ‘गव्हर्नमेंट बाँड इंडेक्स - इमर्जिंग मार्केट्स’मध्ये 28 जून रोजी भारतीय रोख्यांचा समावेश झाल्यानंतर, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी डेट मार्केटमध्ये 8,484 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. दुसरीकडे, याच कालावधीत देशांतर्गत शेअर बाजारात 15 हजार 352 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. या आठवड्यात भारताचा सोन्याचा साठा 904 दशलक्ष डॉलरने वाढला, तर आर्थिक राखीव चलनामध्ये 21 दशलक्ष डॉलरची वाढ झाली.

भारताच्या विक्रमी विदेशी गंगाजळी वाढण्यात अनेक घटकांनी योगदान दिले आहे. भारताने व्यापार अधिशेष राखला आहे. या अधिशेषामुळे विदेशी चलनाचा ओघ वाढत असून, जो साठ्यात मोलाचे योगदान देत आहे. तसेच भारतात होत असलेल्या विदेशी गुंतवणुकीमुळेही गंगाजळी वाढली आहे. 140 कोटी लोकसंख्येची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ ग्राहकसंख्या वाढवणारी ठरली असून, कुशल कर्मचारीवर्ग आणि गेल्या दहा वर्षांत झालेल्या वेगवान आर्थिक सुधारणांमुळे गुंतवणूकदारांना भारत हे आकर्षक ठिकाण वाटते. त्याचवेळी, विदेशात काम करणार्‍या भारतीयांकडून पैसे पाठवण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. या चलनामुळे विदेशी चलन साठ्यात भर पडते. भारतीय रिझर्व्ह बँक तिच्या चलनविषयक धोरणाद्वारे सक्रियपणे राखीव साठा व्यवस्थापित करते. विदेशी चलनामुळे रुपया स्थिर होण्यास मदत होते आणि बाह्य धक्क्यांपासून बचाव होतो. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला, तर मध्यवर्ती बँक आपल्याकडील डॉलरचा साठा बाजारात ओतून, स्थानिक चलनाचे अवमूल्यन होऊ देत नाही. त्याचवेळी, रिझर्व्ह बँकेने सोने खरेदी करून आपल्या साठ्यामध्ये विविधता आणली आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीत झालेल्या वाढीमुळेही भारताचा सोन्याचा साठा वाढला आहे. हे सर्व घटक विदेशी गंगाजळी वाढवण्यात योगदान देत आहेत.

गेल्या वर्षी भारताची विदेशी गंगाजळी जेव्हा 527 अब्ज डॉलर इतकी झाली होती, तेव्हाच ती जगातील चौथ्या क्रमाकांची ठरली होती. भारताने केलेली ही कामगिरी महत्त्वाची अशीच होती. गेल्या वर्षी जगातील सर्वच अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत असताना, भारताने राखलेला विकासाचा वेग सर्वांनाच थक्क करणारा ठरला होता. त्याचवेळी सौदी अरेबिया आणि रशियाला मागे टाकत भारताने विदेशी गंगाजळीत चौथे स्थान मिळवले होते. भारताच्या विदेशी गंगाजळीत रिझर्व्ह बँकेकडे असलेली विदेशी चलन मालमत्ता, सोन्याचा साठा आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आखून दिलेले आर्थिक राखीव चलन यांचा समावेश आहे. चीन, जपान, स्वित्झर्लंड या तीनच देशांकडे भारतापेक्षा जास्त विदेशी चलनसाठा आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने इंग्लंडमधील 100 टन सोने भारतात हलवले होते.

विदेशी चलनसाठा हा वित्तीय संकटात मोलाची भूमिका बजावतो. म्हणूनच, तो वाढवण्यासाठी मध्यवर्ती बँका विशेष प्रयत्न करत असतात. देशांतर्गत चलन स्थिर ठेवण्यास त्याची मदत होते. केंद्रीय बँका त्यांच्या चलनाचे अत्याधिक अस्थिरता किंवा तीव्र अवमूल्यन टाळण्यासाठी विदेशी चलन बाजारात हस्तक्षेप करू शकतात. बाह्य कर्जाच्या जबाबदार्‍या फेडण्यासाठी राखीव सुरक्षितता देण्याचे काम हा साठा करतो. केवळ नवीन कर्जावर अवलंबून न राहता, देश त्यांचा वापर कर्ज सेवा देण्यासाठी करू शकतात. सुरळीत पेमेंट व्यवहार सुनिश्चित करून, आंतरराष्ट्रीय व्यापार ते सुलभ करतात. आयातीचे बिल त्यातून भागवले जाते. मध्यवर्ती बँका व्याजदर तसेच महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी राखीव निधी वापरतात. विदेशी चलन विकणे किंवा खरेदी केल्याने, पैशांचा पुरवठा आणि तरलता यांच्यावर परिणाम होतो. आर्थिक संकट, भांडवलात झालेली वाढ किंवा जागतिक अर्थव्यवस्थेत जेव्हा अस्थिरता निर्माण होते, तेव्हा त्याचा परिणाम कमी करण्याचे काम विदेशी चलनसाठा करतो. अर्थव्यवस्थेचा आत्मविश्वास त्यामुळे वाढीस लागतो, असेही म्हणता येईल. विदेशी चलनातील काही भाग सरकारी रोख्यांसारख्या सुरक्षित मालमत्तेत गुंतवला जातो, ज्यामुळे मध्यवर्ती बँकेला उत्पन्न मिळते. प्रत्येक देशाचे राखीव चलन व्यवस्थापन धोरण त्याच्या अनन्य आर्थिक परिस्थितीवर आधारित असते.

विदेशी चलनाचा साठा सामान्यतः फायदेशीर असला तरी, अत्याधिक गंगाजळीमुळे अर्थव्यवस्थेसाठी काही तोटे उद्भवू शकतात. मोठा चलनसाठा राखीव म्हणून ठेवणे म्हणजे निधी अडकवून ठेवण्याचा भाग ठरतो, अन्यथा जो उत्पादक मालमत्तेत गुंतवला गेला असता, तो अडकून पडतो. जेव्हा एखादा देश स्वतःचे चलन विकत घेऊन परकीय चलन बाजारात हस्तक्षेप करतो, तेव्हा त्याची मागणी वाढते, ज्यामुळे चलन मजबूत होऊ शकते. मजबूत चलन निर्यात स्पर्धात्मकतेला हानी पोहोचवू शकते आणि आर्थिक वाढीवर परिणाम करू शकते. चलन स्थिरीकरणासाठी राखीव निधीवर जास्त अवलंबून राहिल्याने, अर्थव्यवस्था निर्यातीवर अवलंबून राहू शकण्याचा धोका असते. पुरेसा चलनसाठा राखणे विवेकपूर्ण असले तरी, अनपेक्षित परिणाम टाळण्यासाठी धोरणकर्त्यांनी समतोल राखला पाहिजे.

प्रत्येक देशाचा विदेशी चलनसाठा देशाच्या परिस्थितीनुसार बदलतो. राखीव साठ्यात ठराविक महिन्यांची आयात सुनिश्चित होईल, याची काळजी घेतलेली असते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तीन ते सहा महिन्यांची श्रेणी सुचवली आहे. ही श्रेणी व्यापार धक्क्यांमध्ये स्थिरता सुनिश्चित करते. बाह्य कर्ज दायित्वे पूर्ण करण्यासाठी राखीव रक्कम पुरेशी असावी. कमीतकमी 100 टक्के अल्प-मुदतीच्या कर्जाचा आणि दीर्घकालीन कर्जाचा एक भाग यातून देता यावा, असा नियम आहे. अस्थिर भांडवली प्रवाह अनुभवणार्‍या देशांना मोठ्या विदेशी चलनसाठ्याची आवश्यकता असते. त्यासाठीच उदयोन्मुख बाजारपेठा राखीव चलन उच्च पातळीवर ठेवतात. हाच राखीव साठा वित्तीय संकटात सुरक्षाकवच म्हणून भूमिका बजावतो. चलनविषयक धोरण आखणे, तसेच व्याजदर ठरवण्यासाठी मध्यवर्ती बँका त्याचे व्यवस्थापन करतात. विदेशी गंगाजळीबाबत आशादायक वृत्त आले असतानाच, बँकिंग क्षेत्राने आर्थिक निकषांमध्ये दशकातील उच्चांकी कामगिरी केली आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर स्वामिनाथन यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे एकूणच भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय बँका यांची कामगिरी भारताच्या वेगवान विकासाला अनुकूल अशीच आहे, असे निश्चितपणे म्हणता येते.


Powered By Sangraha 9.0