मुंबई : मराठा आरक्षणासंबंधी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर मंगळवारी विरोधकांनी ऐनवेळी बहिष्कार टाकला. त्यामुळे विरोधकांचा बोलवता धनी कोण आहे? असा सवाल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. बुधवारी सभागृहात विरोधकांच्या अनुपस्थितीचा मुद्दा चांगलाच गाजला. त्यामुळे सभागृह ४ वेळा तहकूब करण्यात आले होते.
आशिष शेलार म्हणाले की, "मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याबाबत सर्वपक्षीय बैठक ठरलेली असताना विरोधक कोणत्या कारणाने त्यात गैरहजर राहतात? समाज आंदोलन करत असताना, आपल्याकडून न्यायाची अपेक्षा करत असताना हेच कैवार दाखवणारे विरोधक वेगळी भूमिका का घेतात?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "दुपारपर्यंत बैठकीला येतो म्हणणारे ऐन वेळेवर अचानक बैठकीला हजर राहत नाहीत. यांचा बोलविता धनी कोण आहे? सभागृहाच्या बाहेर यांचा बोलविता धनी आहे. तो सांगतो की, तुम्ही मराठा आरक्षणाच्या बैठकीला जाऊ नका. त्यामुळे त्यांचं मराठा आरक्षणाला समर्थन आहे का? आणि सर्वपक्षीय बैठकीला न येण्यासाठी त्यांना कुणाचा मेसेज आला? त्यांचा बोलविता धनी कोण?, याबद्दलची भूमिका विरोधकांनी स्पष्ट करायला हवी. तसेच विरोधी पक्षाने आरक्षणाच्या विषयावर केवळ राजकारण केलं आहे," असेही ते म्हणाले.