नवी दिल्ली : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी करणार आहेत. मोदी ३.० सरकारची चीनला घेरण्याची रणनीती असणार आहे याच पार्श्वभूमीवर शपथविधी सोहळ्याला शेजारील देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात भारताचे लक्ष पुन्हा एकदा शेजारी राष्ट्रांवर केंद्रित होईल आणि भारत त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ आणि बांगलादेश हे असे शेजारी देश आहेत जे भारताविरुद्ध वापरण्याच्या रणनीतीवर दीर्घकाळापासून काम करत आहेत. या देशांशी संबंध अधिक दृढ करून भारत चीनच्या चाली हाणून पाडेल, असे मानले जात आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सलग तिसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी ०९ जून रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. यामुळे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी असे नेते बनतील, ज्यांनी सलग तीन वेळा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने भाजपच्या मुख्यमंत्र्यांपासून ते सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. भारतातील नव्हे तर आशियातील पहिल्या लोको पायलट सुरेखा यादव या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर भारताच्या शेजारी देशांच्या राष्ट्रप्रमुखांनाही यात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले असून, ते संबंधित पक्षाने स्वीकारले आहे.