मुंबई : विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेने अखेर माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेने अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन, या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार देऊ नये, अशी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन पक्षाचे उमेदवार अभिजित पानसे हे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, असे मनसे नेते शिरीष सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी राज ठाकरे यांना विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन अभिजीत पानसे हे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, असा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. निरंजन डावखरे हेच उमेदवार असतील, असे ठरले आहे. देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्याकडे येऊन गेल्यानंतर पुन्हा एकदा ते दोनदा या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.