मुंबई : नुकताच २०२४ च्या लोकसभा निवडणूकीचा निकाल लागला. यात पहिल्यांदाच खासदारकीसाठी हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून भाजपकडून निवडणूक लढवणार्या कंगना राणावत हिने विजय मिळवला. परंतु, काल ७ जून २०२४ रोजी चंडीगढ एअरपोर्टवर तिच्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे. नवनिवार्चित खासदार कंगना राणावत (Kangana Ranaut) काल चंदीगढ विमानतळावरुन दिल्लीसाठी निघाली होती. तेव्हा एका महिला सुरक्षाकर्मीने तिच्या कानाखाली लगावली. या घटनेनंतर विविध प्रतिक्रिया उमटत असून शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने केलेल्या वक्तव्याविरोधात महिला सुरक्षाकर्मीच्या मनात राग होता म्हणून हे कृत्य केल्याचे तिने म्हटले. आता तिला निलंबित करण्यात आले असून घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर कंगनाला लोकांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान एका बॉलिवूड निर्मात्याने कंगनासोबत घडलेल्या या घटनेची तुलना थेट इंदिरा गांधींच्या हत्येशी केली आहे.
फिल्ममेकर
अशोक पंडित यांनी कंगनासोबत घडलेल्या घटनेवर भाष्य केले आहे. सोशल मिडियावरुन एक व्हिडिओ शेअर करत ते म्हणाले, "कंगनासोबत जी वर्तणूक झाली ती चुकीची आहे. मी याची निंदा करतो. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींसोबतही अशाच प्रकारची घटना झाली होती. आज कंगनासोबत होत आहे. मला वाटतं त्या सीआयएसएफ महिला सुरक्षाकर्मीला लवकर अटक करावी आणि तिच्याविरोधात कडक कारवाई करावी. जेणेकरुन भविष्यात आणखी कोणीही खासदारासोबत असा दुर्व्यवहार करणार नाही."
दरम्यान, कंगनाने या घटनेनंतर व्हिडिओ शेअर करत आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली होती. मात्र पंजाबमध्ये वाढणारा उग्रवाद, दहशतवाद आपण कसा सांभाळणार आहोत अशी चिंता देखील तिने यावेळी व्यक्त केली होती.