अतिक्रमणधारकांच्या हल्ल्यात अभियंत्यांसह पोलीस अधिकारीही जखमी

निष्कासन मोहीम सुरूच राहणार : बीएमसी

    06-Jun-2024
Total Views |

bmc


मुंबई, दि.६ : प्रतिनिधी 
मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत पवई येथे करण्यात आलेली अतिक्रमण निर्मूलन कारवाई ही कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच करण्यात येत होती. या हल्ल्यात जखमी महानगरपालिका कर्मचारी तसेच पोलीस कर्मचा-यांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह प्रत्यक्ष ठिकाणास भेट देवून आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या कारवाईदरम्यान महानगरपालिका कर्मचा-यांवर झालेला हल्ला कदापि सहन केला जाणार नाही. महानगरपालिका प्रशासन कर्मचा-यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी कर्मचा-यांना दिला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईगाव व मौजे तिरंदाज गाव येथील भूखंडावर सुमारे ५०० इतक्या झोपड्या असलेली ‘लेबर हटमेंट’ तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आली होती. या झोपड्यांवर कारवाई करावी, असे निर्देश राज्य मानव अधिकार आयोगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास दिले होते. महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५५ नुसार या झोपडपट्टीधारकांना यापूर्वी देखील नोटिस देण्यात आल्या होत्या. तसेच, मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम ४८८ तरतुदीनुसार, या झोपड्यांच्या कब्जेदारांना शनिवार, दि. १ जून २०२४रोजी कायदेशीर नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. ४८ तासांच्या आत स्वत:हून ही अतिक्रमणे निष्कासित न केल्यास महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने ही अतिक्रमणे हटविण्यात येतील, असे या नोटीसीत नमूद करण्यात आले होते. याचाच अर्थ, महानगरपालिका प्रशासनाने विहित प्रक्रिया पूर्ण केली तसेच आगाऊ सूचना देवून पुरेसा वेळ देखील दिला होता.

त्यानुसार, गुरूवार, दिनांक ०६ जून रोजी महानगरपालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्त उपलब्ध होताच अतिक्रमण निष्कासनाची कारवाई सुरू केली. या कारवाईप्रसंगी स्थाानिक रहिवाशांनी विरोध करत दगडफेक केली. या घटनेत महानगरपालिकेचे ५ अभियंते, ५ मजूर व त्यासोबत १५ पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, कायद्याचे पालन करुन ही निष्कासन मोहीम यापुढे देखील सुरू राहणार असल्याची भूमिका महानगरपालिका प्रशासनाने घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.