शकुनी नीतीमुळे इंडी आघाडीचा विजय : चंद्रशेखर बावनकुळे

    06-Jun-2024
Total Views |

Bawankule
 
नागपूर : शकुनी नितीमुळे इंडी आघाडीचा विजय झाला. पण जनता एकदा भ्रमित होऊ शकते, वारंवार होणार नाही. महायुती राज्याला मजबूत सरकार देणार आहे, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महाराष्ट्रात निर्विवाद देवेंद्र फडणवीस हेच भाजपाचे नेते आहेत. संपूर्ण पक्ष, आमदार आणि बुथ लेव्हलचा कार्यकर्ता फडणवीसांसोबत उभा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबतीने फडणवीस पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू करतील आणि महाराष्ट्रात महायुतीच्या २०० जागा निवडून येतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
हे वाचलंत का? -  रोहित पवारांच्या दाव्यावर तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, "जाणीवपूर्वक..."
 
ते पुढे म्हणाले की, "राज्यातील महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत कपट आणि शकुनी नीतीचा अवलंब करून, जात व धर्माचे राजकारण करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला. मविआने मतदारांमध्ये संविधान बदलवणार असा बिनबुडाचा प्रचार केला. मराठा समाजाला महायुती आरक्षणच्या विरोधात असल्याचे सांगितले. इंडिया आघाडी जातीचे राजकारण करूनच विजय मिळवू शकते. त्यांच्याकडे विकासाबाबत बोलण्यासारखे काहीच नाही. मविआच्या एकाही उमेदवाराने विकासाच्या मुद्दयावर मते मागितली नाहीत. जनता एकदा भ्रमित होऊ शकते, वारंवार होणार नाही. विकासाचे राजकारण देशाला पुढे घेऊन जाणार आहे. आता ते ईव्हीएम वर का बोलत नाहीत?, असा सवालही त्यांनी विरोधकांना केला आहे.