मुंबई : उद्धवजी देशात भाजप ४५ च्या वर गेली आहे. तुम्ही सन्यास घेणार का? असा सवाल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी गुरुवारी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आशिष शेलार म्हणाले की, "देशात भाजपच्या ४५ च्या वर जागा येणार नाहीत, असं उद्धवजी म्हणाले होते. आता ते तोंड का लपवत आहेत. भाजप ४५ च्या वर गेली. त्यामुळे उद्धवजी सन्यास घेणार का ते त्यांनी सांगावं, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, "जे रोज बालनाट्य करतात त्यांना तेच दिसतं. ते रोज सकाळी उठून बालनाट्य करत असल्याने त्यांना सगळीकडे तेच दिसतंय. विरोधक देव पाण्यात घालून बसले आहेत. पण जनतेचा कौल एनडीएच्या बाजूने असल्यामुळे त्यांना पुढची पाच वर्ष विरोधात बसायचंय. इंडी आघाडीचा स्वप्नभंग झालाय. निकालानंतर आमचं सरकार येईल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, आता मात्र शेपूट घातलं आहे," असा टोलाही त्यांनी लगावला आहे.