लोकसभेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

    05-Jun-2024
Total Views |
 
Ajit Pawar
 
मुंबई : कुठलेही अपयश अंतिम नसते. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने लोकसेवेला वाहून घ्यावं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. मंगळवार ४ जून रोजी लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता अजित पवारांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलेही अपयश अंतिम नसते. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचे विश्लेषण केले जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील."
 
 
 
ते पुढे म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. याशिवाय अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत. पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे. पक्षाच्या या विजयी उमेदवारांचेही त्यांनी अभिनंदन केले. देशात लवकरच सलग तिसऱ्यांदा स्थापन होणारे ‘एनडीए’चे सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल," अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.
 
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’ने बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले. ‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्याने परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनींना त्यांनी धन्यवाद दिले.