मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ निकाल जाहीर झाले असून एनडीए पुन्हा एकदा बहुमत मिळाले आहे. दरम्यान, राज्यात महायुती विरुध्द मविआ असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. एकूण ४८ जागांपैकी महायुतीला १८ जागांवर विजय मिळविता आला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपच्या वतीने राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत.
दरम्यान, देशातील जनतेने विकासाच्या राजकारणाला पुन्हा एकदा जनादेश दिला असून राज्यातील मतदारांनी दिलेला कौल आम्ही अत्यंत विनम्रपणे मान्य करतो. जनतेच्या या विश्वासाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो, असेही भाजपकडून जाहीर करण्यात आले आहे. भाजपने पुढे असेही म्हटले आहे की, पक्ष देशासह राज्याच्या विकासासाठी आणखी जोमाने काम करत राहील.
आम्ही राष्ट्रविकासासाठी कटीबद्ध असून कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे कौतुक व त्यांचे अविश्रांत कष्ट हेच आपल्या ऊर्जेचा स्रोत आहे. निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी राज्यभर जाऊन त्यांनी जनतेशी संवाद साधला. देशातील विकास कार्याची माहिती दिली या माध्यमातून लोकांशी जोडले गेले हे कौतुकास्पद आहे.