मुंबई : लोकसभा निवडणूकीचा निकाल आज जाहीर होणार असून सकाळी ८ वाजतापासून मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत पुढे आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात महायूती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
राज्यात यंदा भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायूती विरुद्ध काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची महाविकास आघाडी असा थेट सामना आहे. दरम्यान, यूती आणि आघाडी यांच्यापैकी राज्यात कुणाचा डंका वाजणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आतापर्यंत पुढे आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात भाजप १३ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस १० जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. उबाठा गटाकडे ९ जागा असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे प्रत्येकी ७ जागा आहेत. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे १ जागा असून १ जागा ही अपक्ष आहे.
सध्या भाजप हा पहिल्या क्रमांकावर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केवळ एकाच जागेवर आघाडी घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान, प्रत्येक क्षणाला ही आकडेवारी बदलताना दिसत असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत असल्याचे चित्र आहे.